सिंगापूर नाळ – तवीची नाळ

रविवार, ९ मार्च २०२५

फेब्रुवारी २०२५ मध्ये शेवटचा ट्रेक झाला होता, आणि त्यानंतर बराच काळ गेला होता. त्यामुळे अंग कुजल्यासारखं वाटत होतं. ट्रेकशिवाय चैन पडत नव्हती. मग साकेत यांना विचारलं, “कोणता ट्रेक प्लॅन आहे का?” त्यांनी लगेच उत्तर दिलं, “सिंगापूर नाळ उतरायची आणि तवीची नाळ चढायची आहे!” मी हर्षोल्हासाने होकार दिला. कारण घोळ-रायगडच्या नंतर पुन्हा एकदा आमच्या टीटीएमएम टीमसोबत भटकंतीची संधी मिळणार होती.

सकाळची घाई…
सकाळी ३ वाजता उठून आवरलं आणि बरोबर ४:०० वाजता साकेत यांच्याकडे पोहोचलो. तिथून निघून साधारण ४:३० वाजता पुण्याहून ट्रेकला सुरुवात केली. जेमतेम ७:०० वाजता सिंगापूर गावात जिल्हा परिषद शाळेजवळ असलेल्या वाटाडे पांडुरंग मोरे यांच्या घरी पोहोचलो. तिथे अस्सल फक्कड काळा चहा घेतला आणि ७:२५ वाजता ट्रेकला सुरुवात झाली.

चला, ट्रेकला जाऊ!
पांडुरंग यांच्या घरासमोरूनच आम्ही चालायला सुरुवात केली. अवकाशात सुंदर तांबडं फुटलं होतं, पण इथे सूर्योदय दिसणं शक्य नव्हतं—कारण चहूबाजूंनी सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी वेढलेलं हे गाव!

सिंगापूर नाळ उतराई
सुरुवातीच्या जोरदार चालीने आम्ही सिंगापूर नाळ उतरून वरदायिनीच्या ओढ्यापर्यंत पोहोचलो. पुढे एका छोटेखानी पठारावर पोहोचल्यावर खाली दापोली गाव, समोर दुर्ग दुर्गेश्वर रायगड, उजवीकडे ताठ उभा लिंगाणा आणि बाजूला रायलिंग पठार असा प्रचंड देखणा नजारा समोर दिसत होता.
थोडं पुढे जाताच, “शॉर्टकट घेतोय का?” अशी शंका संदीप कुतवळ यांनी व्यक्त केली. वाटाडे पांडुरंग मोरे यांनी समजावत सांगितलं, “ही वाट वरून जाते, यात काही चिमणीची वाट लागत नाही.” तरीही, आमचा ट्रेकिंगचा उत्साह पाहता आम्ही ठरवलं की, संपूर्ण सिंगापूर नाळ उतरणार!
९:३० वाजले तरी ऊन झोम्बायला सुरुवात झाली होती. हवेत गारवा होता, त्यामुळे पुढे एका खडकावर विसावून अल्पोपहार घेतला. आज सोबत होते संदीप कुतवळ सर, मिलिंद बोडस, मुकुंद पाटे, विजय बुटाला—यांसारखे अनुभवी ट्रेकर्स! त्यामुळे घाटवाटांच्या चर्चा रंगल्या, आणि मी आनंदाने त्या ऐकत बसलो!


तवीची नाळ चढाई – कडक उन्हाचा सामना
खाऊन विसावलो तोच रामेश्वर कवटीकवार सर म्हणाले, “चलो!” मग काय, पटकन कचरा गोळा करून आम्ही तिथून पुढे तवी नाळेच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केलं. काही अंतरावर नुकतीच एखाद्या जनावराची शिकार झाली असावी—रक्त सांडलेले दगड आणि मांसाचे ताजे तुकडे दिसले. त्यामुळे थोडंसं दडपण आलं. पण मागे फिरणं शक्य नव्हतं!
११:३० वाजले होते, सूर्य माथ्यावर होता. आजूबाजूला पाणी नव्हतं म्हणूनच हरीश यांनी प्रत्येकाने ५ लिटर पाणी सोबत आणायला सांगितले होते. त्यांच्या अनुभवसंपन्नतेमुळे हा निर्णय किती महत्त्वाचा होता, हे आता प्रकर्षाने जाणवत होतं. ट्रेकिंगमध्ये अनुभवी मार्गदर्शकाचे ज्ञान आणि पूर्वानुभव किती अमूल्य असतात, याचा प्रत्यय आला. उष्णतेचा त्रास कमी व्हावा, शरीर हायड्रेटेड राहावं आणि दम लागणार नाही यासाठी हरीश यांनी दिलेला सल्ला सुवर्णमोलाचा ठरला.
आता १२ वाजले. वरून नारायण आणि खाली उष्ण दमट कोकण प्रदेश! त्यात आम्ही तव्यावर! खरतर “तवी” नाव कसं पडलं हे गूढच! कदाचित उन्हाने तापलेल्या दगडांमुळे हात भाजला गेला असेल आणि आम्ही मिश्कीलपणे “तवा, तवी” असा अर्थ लावला असेल!
वातावरण गरम, पाणी गरम, म्हणजे काय तर खालून गरम! वरून गरम! मधूनही गरमच! त्यामुळे आमचा वेग कमी झाला आणि अगदीच हळूवार बसत-उठत आम्ही पुढे जात होतो. आज मी थोडा जास्तच मंदावलो, का असं झालं ते कळलं नाही, पण जिद्द सोडणं नाही हे मात्र ठरलेलं होतं!

सूर्य कोरडा कडाडतो, तापते रान अन् माळ,
गरम वाऱ्याच्या झळांनी, जळती सृष्टी बेहाल!
आकाश झाले अंगारा, तृष्णेने व्याकुळ भूमी,
सुकले झरे, कोरडे वारे, उन्हाचं गाणे उर्मी!

मी थोडा मागे राहिलो, संदीप दादांबरोबर गप्पा मारत पुढे जात होतो. संदीप दादा हे अत्यंत अनुभवी गिर्यारोहक असून १९८८ पासून ते सातत्याने ट्रेक करत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या या साहसी प्रवासात त्यांची पत्नी मनीषा कुतवळ नेहमीच त्यांच्यासोबत असतात. त्यांच्या दोघांचा ट्रेकिंगवरील पॅशन विलक्षण आहे. संदीप दादांचे सह्याद्रीवरील लेखन जबरदस्त असते, आणि त्यांच्या शैलीत एक वेगळीच जादू असते. त्यांच्या लिखाणातून प्रेरणा घेतच मी लिहायला सुरुवात केली आहे!

ही नाळ पार करताना अचानक समोरून काही माणसं येताना दिसली. शिकारीच्या हेतूने भटकणारे ते स्थानिक होते—हातात अणुकुचीदार भाले, जुनाट पण धोकादायक बंदुका, आणि सोबत गावठी शिकारी श्वापद. त्यांची चाल, त्यांच्या डोळ्यातील तीक्ष्ण नजर, आणि शांत वातावरणातही जाणवणारा दबदबा—क्षणभर सगळंच भारावून टाकणारं होतं. नकळत मनात हलकीशी धडकी भरली. मात्र, आमचे वाटाडे पांडुरंग मोरे यांना त्यांनी ओळखलं, आणि क्षणातच वातावरण निवळलं. स्थानिक वाटाड्या असणं ही केवळ सोय नाही, तर निसर्गाच्या अशा गूढ वाटांमध्ये एक सुरक्षिततेची हमी आहे, हे त्या क्षणी प्रकर्षाने जाणवलं. तरीही, जास्त वेळ तिथे थांबणं टाळून आम्ही झपाझप पायउतार होत पुढे निघालो…

खडतर चढ आणि चिमणी क्लाइंबिंग
गप्पा रंगल्या होत्या. त्या गप्पांच्या ओघातच आम्ही चिमणी क्लाइंबिंग च्या ठिकाणी येऊन पोहोचलो—जो या ट्रेकचा खास आणि चित्तथरारक टप्पा होता. थकवा जाणवत होता, पण नेहमीप्रमाणे जिद्दीने पुढे सरसलो. चिमणी क्लाइंबिंग सहज पार केलं आणि स्वतःच्या क्षमतेचा पुन्हा एकदा आनंद लुटला! वरती पोहोचताच मागून येणाऱ्या सोबत्यांसाठी थांबलो. साकेत आणि मी मिळून मागून येणाऱ्यांना मार्गदर्शन करत वर चढायला मदत केली. ही वाट तितकी अवघड नाही, पण जागा मर्यादित आहे, थोडी अडचणीची आहे. बॅग घेऊन चढणे अशक्यच! बाजूने रोप लावला तर चढणं आणखी सोपं होईल असा हा टप्पा. एक-एक करत सगळे वर आले, आणि मग आम्ही मोकळ्या ढाकळ्या जागी थोडा वेळ थांबलो. अर्थात, इथे फोटोशूट करणं आलंच! जिथून फणशी नाळ स्पष्ट दिसते, तिथे पाठमोरे फोटो घेतले आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली.
आता मात्र शरीराची मर्यादा जाणवू लागली. ऊन वाढलेलं, चढ अवघड, आणि उर्जा संपू लागल्यासारखी जाणवली. ठरलं होतं की नाळ चढून वर गेल्यावरच जेवायचं, पण माझा बलिदान मास चालू असल्याने मी रोज ठराविक वेळी—२४ तासांच्या अंतराने, साधारण १:३० वाजता जेवतो. म्हणूनच, शिदोरी सोडली. विजय काकांनीही साथ दिली.

थोडा विसावलो, पुन्हा चालायला सुरुवात केली, पण आता सगळे जण पुढे गेले होते. मी मात्र एकटाच मागे उरलो. नाळ संपतेय असं वाटत होतं, पण पुढे गेल्यावर समजायचं की खिंड अजूनही दूरच! एक वळण ओलांडलं की नाळ संपल्यासारखी भासते, आणि लगेच अजून एक वळण दिसतं… असं करत प्रवास सुरूच राहिला!

अवघड चढ, निखळणारे दगड आणि घोण्याचा डुबा
हा शेवटचा टप्पा—माणसाची खरी परीक्षा घेणारा! समोर चढत असताना हात धरलेला दगड सुटेल की पायाखालचा दगड निखळेल, अशी परिस्थिती! पांडुरंग दादांनी कोयत्याच्या साह्याने बाजूने मार्ग तयार केला, आणि कसाबसा पकड घेत घेत आम्ही वर पोहोचलो—थेट कसपट्यातच. समोर नजर टाकली, तर फक्त गवत आणि कारवीच्या वाळवंटासारख्या झुडुपांनी भरलेलं माळरान.
पांडुरंग दादांच्या मागे चालत, अवघड वाट ओलांडत आम्ही पुढे निघालो. थोड्याच अंतरावर सरळ वरच्या दिशेने घोण्याचा डुबा लागला. इथे सावली मिळाली म्हणून थोडा वेळ विसावलो. मला थोडे क्रॅम्प्स जाणवले, म्हणून पटकन एक गोळी घेतली आणि काही मिनिटे विश्रांती घेतली.
थोडं पुढे गेल्यावर टोळ-दगडांनी भरलेल्या लहानशा वाटेने नैसर्गिक गुहेपर्यंत पोहोचलो. इथे गडद सावली मिळाली, म्हणून थोडा दम काढला. बाटलीतल्या गरम झालेल्या पाण्याचा फायदा घेत मस्त कॉफी बनवली आणि ती पिऊन फ्रेश झालो.

तिथून उजव्या बाजूने वर आलो, आणि खाली पाहिलं तर एका सुंदर, हिरवीगार, भरगच्च झाडांनी वेढलेल्या जागेत पोहोचलो. लहान-मोठ्या झाडांनी नटलेली ही जागा पाहून कळलं की, हा “आंब्याचा ओढा”! इथेच वरती गारेगार पिण्यायोग्य पाणी मिळालं, त्यामुळे भरपूर पाणी पिऊन आणि गरजेपुरतं भरून घेतलं.

सूर्य मावळतीला झुकत होता, वातावरण थोडं गडद होत चाललं होतं… पण तरीही मनात एकच विचार—“कधी एकदा हा ओढा संपतो?” 😅

ओढ सिंगापूरची
नाळेच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचलो, मागे राहिलेल्यांची वाट पाहत थोडा वेळ विसावलो. मी आणि साकेतने पुन्हा थोडं थंडगार पाणी घेतलं आणि एनर्जलचे घोट घेत नव्या उर्जेने भरून गेलो.
सगळे जमा झाले तसे शेवटचा चढ चढायला सुरुवात केली—डाव्या बाजूने वर, अजून वर, आणि अजून थोडा वर! दम लागत होता, पाय जड झाले होते, पण माथ्याजवळ पोहोचताच समोर सिंगापूर गाव दिसलं! त्या क्षणी आलेला आनंद अवर्णनीय होता—दहा तासांच्या संघर्षानंतर, उष्णतेच्या परीक्षा देत अखेर सिंगापूर गाव समोर होतं.
थकलो होतो, पण त्या दृश्याने सगळा शीण कुठच्या कुठे गेला. चेहऱ्यावर हास्य होतं, डोळ्यांत समाधान!

आजच्या भटकंतीचा गोड शेवट
एकूण १२.२० किमी अंतर आणि ९०० मीटर उंची पार करत हा रोमांचक ट्रेक तब्बल १० तासांमध्ये पूर्ण झाला. सिंगापूर गावात पोहोचल्यावर सगळ्यांनी सुटकेचा श्वास घेतला. सगळा थकवा घालवण्यासाठी पांडुरंग दादांकडे फक्कड काळा चहा घेतला. त्या गरम गरम चहाने शरीराला आणि मनाला एक नवी ऊर्जा मिळाली. त्यानंतर गावच्या विहिरीवर पोहोचलो, पोवऱ्याने थंडगार पाणी काढून मस्त अंघोळ केली—तो आल्हाददायक अनुभव केवळ शब्दांत मांडणं कठीण! पांडुरंग दादांचा निरोप घेत, मनात ट्रेकच्या आठवणी घेऊन आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. शेवट गोड झाला, आणि आता मनात एकच विचार—पुढचं साहस केव्हा?

ट्रेक भिडू – सह्याद्रीचे शिलेदार!

या अविस्मरणीय ट्रेकमध्ये माझ्यासोबत होते—
🚩 साकेत मिठारी – ट्रेक प्लॅनर आणि सह्याद्रीचा निस्सीम भक्त!
🚩 विजय बुटाला – “घोड्यासारखा उडतो” म्हणावं तर जागा नाही!
🚩 डॉ. रामेश्वर कविटकर – ज्ञानाचा खजिना आणि सह्याद्रीच्या वाटांचा डॉक्टर!
🚩 संदीप आणि मनीषा कुतवळ – ट्रेकिंग वर्ल्डमधलं पॉवर कपल, सोबतीला अनुभवाचा साठा!
🚩 मुकुंद पाटे – ट्रेकिंगच्या मैदानातले शांत, पण तगडे योद्धा!
🚩 चंद्रकांत पाटील – चैतन्याने भरलेले, जिथे हे तिथे एनर्जी!
🚩 डॉ. अजय इंगळे – माउंटन मेडिसिन एक्सपर्ट, डोंगरात डॉक्टर सोबत म्हणजे काय टेन्शनच नाही!
🚩 चैतन्य देशपांडे – नावाप्रमाणेच सदैव चैतन्यमय!
🚩 मिलिंद आणि मोहना बोडस – ट्रेकिंगची जुगलबंदी, “डबल धमाका”!
🚩 गजेंद्र माळी – माळरानावरचा वाघ, जिथे थांबला तिथे इतिहास जपला जातो!
🚩 रामेश्वर नरवडे – हिमतीला सलाम!

हे भिडू सोबत असले, की सह्याद्रीचं कोणतंही दगडधोंडं सर करायला वेळ लागत नाही! 🏔️

Leave a Reply