सिद्धगड ट्रेक संपूर्ण ..
सिद्धगड – ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील कठीण श्रेणीत असलेला किल्ला .
वर्षाचे शेवट एका वेगळ्या आणि अत्यंत थरारक राज मार्गाने सिद्धगड ट्रेक पूर्ण केला किंबहुना प्रदक्षिणाच केली..
ठरल्याप्रमाणे मी,दीपक पाटील,रुपेश कुलकर्णी, पियुष कुलकर्णी,पराग मेटकर असे रविवारी सकाळी 4.30 वाजता चिंचवड हून निघालो . जवळपास 8 वाजता गडाच्या पायथ्याशी असलेल्या बोरवाडी गावात पोहोचलो.
बोरवडी गावच्या मागच्या शेतातून थेट कातळ कड्याच्या दिशेने जाण्याच्या ऐवजी आम्ही धरणाच्या दिशेने जाणारा मोठा रस्ता पकडला आणि आम्ही बराच वेळ चालत राहिलो, पण आम्हाला रस्त्याचा सुगावा काही लागेना.शेवटी आम्ही खिंडीच्या दिशेने एका नाळेच्यामधून वर जाण्याचा निर्णय घेतला. वाट बिकट होती, घनदाट जंगल असल्यामुळे आम्हाला उभा राहता येऊन चालता येणे शक्य नव्हते,त्यामुळे आम्ही अक्षरशः हात खाली टेकून चालत होतो. वाट नव्हतीच खरं ती,पण आम्ही मार्ग काढत काढत खिंडीच्या दिशेने जात होतो. बराच वेळ तंगडतोड केल्यानंतर झाडाझुडपातून काट्याकुट्यातून वाट काढत आम्ही कसेबसे जाखमाता देवीच्या मंदिरापाशी पोहोचलो. देवीचे दर्शन घेऊन बाजूच्या असलेल्या पायरी मार्गाने आम्ही खिंडीच्या दिशेने मार्गक्रमण करत राहिलो. खिंडीत पोचल्यानंतर खिंडीच्या समोरून एक रस्ता खाली उतरून माचीवर असलेल्या सिद्धगडवाडीकडे जातो तर एक वाट राजा सुळक्याच्या बाजूने वर थेट बुरुजाकडे जाते.
आम्ही राजा सुळक्याची वाट धरली आणि मार्ग काढत काढत कसेबसे थोडे वर पोचलो.आम्हाला वर एक पाण्याचे टाके दिसले. पाण्याचे टाके ओलांडून आम्ही जरासे पुढे गेले असता आम्हाला एक पायरी मार्ग दिसला. पायरी मार्ग ओलांडून आम्ही वर गेलो असता धक्काचं बसला, कारण पुढे वाटच नव्हती. आता आमच्यापुढे फक्त दोनच मार्ग होते एक तर धोका पत्करून वर जायचं किंवा गप गुमान परतीचा रस्ता धरायचा.
आणि नेहमी ठरल्याप्रमाणे आम्ही पहिला मार्ग स्वीकारला, धोका पत्करून वर जाण्याचा. वाट नव्हतीच तशी ती, कुठे आम्हाला पायऱ्या लागायच्या तर कुठे लागत नव्हत्या आम्ही गोंधळून जायचो.पायऱ्या लागल्या की जीवात जीव यायचा. कारण जेवढ्या मोडकळीस आलेल्या किंवा तुटलेल्या पायऱ्या होता तेवढाच रस्ता चांगला होता बाकीचे सगळं वाळलेलं गवत आणि घसरडी माती होती. पकडायला साधं एक झुडूप सुद्धा नव्हतं.पकडायला गेलो तर गवत तुटून निघायचं पाय घसरायचे आणि आमच्या दोन्ही बाजूला दरी होती.
पाय घसरला तर थेट दरीत अशी ही वाट होती. आमच्यातला एक सोबती पार घाबरला होता त्याचे हात आणि पाय लटलटलटलट कापत होते. त्याची अवस्था बघून मी गावातल्या एका माणसाला फोन केला आणि त्याला रस्ता विचारला, तो बोलला तुम्ही ज्या रस्त्याने गेला तो रस्ता नाहीच त्या रस्त्याने फक्त आणि फक्त गिर्यारोहकच जातात.
पण त्याने सांगितलं की तुम्ही काहीही करून बालेकिल्ल्यावरती पोहोचा उतरताना दुसरी वाट आहे. मग जीवात जीव आला आणि आत्मविश्वासही वाढला की आता काहीही करून त्यासमोर दिसणाऱ्या बुरुजावरती पोहोचायचं म्हणजे पोहोचायचं. आणि मग काय पाण्याचे दोन घोट घेतले बॅग उचलली पाटीला लावली आणि जो थेट निघालो ते महादरवाजातून प्रवेश करून बुरुजावर जाऊनच सुटकेचा श्वास घेतला.
शशशश….आलो बाबा एकदाचा वर… काय म्हणे त्या रस्त्याने फक्त गिर्यारोहकच येतात मग आम्ही कोण आहोत…
पण खरंच जसं नाव तसाच गड आहे बर का गडावर जायचं म्हणजे कोणाबी आयऱ्यागऱ्याचे काम नाही बर का….
कितीबी हाडाचा ट्रेक्कर,भटका, उनाड आणि कितीही मुरलेला असेल त्यांनी या राज मार्गाने सिद्धगडावरती पोचून दाखवावे बरं का कुठल्याही साधनसामग्रीच्या मदतीशिवाय….
बालेकिल्यावरती बघण्यासारखे 2 बुरुज आहेत,नंदी आणि महादेवाचं पिंड आहे,पाण्याच्या टाक्या आहेत,पडलेल्या अवस्थेत सदर सदृश अवशेष आहे.बालेकिल्ल्यावरून गोरखगड,आहुपे घाटाचा विहंगम दृश्य दिसते .हे सर्व बघून आम्ही बालेकिल्ला उतरायला घेतला .महादेवाच्या मंदिराच्या समोर जी वाट खाली उतरते ती सध्याची वाट आहे.खाली उतरून आम्ही सिद्धगड माचीवर आलो. गड उतार होत असताना मध्येच एक गुहा लागते जिथे 9-10 जण आरामशीर राहू शकतात .जवळपास 4.45 वाजता आम्ही गडाच्या पायथ्याला पोहोचलो.5 वाजता परतीचा प्रवास सुरु केला .
सिद्धगड ..एक थरारक,तंगडतोड आणि शरीराची कस घेणारा एक अविस्मरणीय ट्रेक पूर्ण झाला …
– अशोक भाकरे
खरंय सिद्धगड अगदी कसाही केला तरी शरीराची कास पाहणारा गाद आहे, बालेकिल्ला पण चढायला अवघड आहे, येरागबाळ्याचं काम न्हवं