Ankai tankai ramshej tringalgadh & kavnai fort trek

  • Ankai tankai ramshej tringalgadh & kavnai fort trek
23 dec – 24 dec 2023 रोजी
मी व इतर 9 जणांनी नाशिक दौरा केला. या दौऱ्यात आम्ही किल्ले अंकाई आणि टंकाई रामशेज आणि त्रिंगलवाडी हे किल्ले पाहायचे ठरवले होते..दौऱ्याच्या नियोजनाप्रमाणे शनिवारी पहाटे चार वाजता आम्ही दोन कार मधून पुणे सोडले.. आमचा पहिला ट्रेक मनमाड जवळील अंकाई टंकाई हा होता..हे जोड किल्ले दोन स्वतंत्र डोंगरावर बांधलेले असून हे दोन डोंगर एका चिंचोळ्या खिंडीने जोडले गेलेले आहेत…आम्ही अंदाज काढलेल्या वेळेपेक्षा चक्क 1.5 तास अगोदर अंकाई किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो… पोहोचताच आम्ही किल्ले अंकाई चढायला घेतला या किल्ल्याचा बराचसा भाग हा पायऱ्यांनीच चढावा लागतो.. या ठिकाणी तेरा लेण्या सुद्धा आहेत. अंकाई किल्ल्यावर अंकाई देवीची भव्य अशी मूर्ती आहे या देवीचे रूप पाहताच भुरळ पडते. .. आणखी काही वर गेल्यानंतर पाण्याची काही टाकी व ऋषी अगस्ती ज्या गुहेत वास्तव करीत ती गुहा येथे दिसून येते. अगस्ती ऋषींचे देऊळ ही येथे बघता येते. इथून पुढे चालत राहिल्यावर राजवाड्याचे काही अवशेष दिसतात. . या किल्ल्यावरून समोर लक्ष वेधून घेणारा सुळका म्हणजे हडबीची शेंडी दिसून येते. समोर कातरा किल्ला दिसून येतो.किल्ले अंकाई बघून झाल्यावर समोरच जोडगळीतला टंकाई किल्ला पाहायला निघालो… टंकाई किल्ल्याला मोठे प्रशस्त पठार लाभलेल्या असून या पठारावर एक तलाव व पाण्याची टाकी आढळून येते तसेच या पठाराच्या मध्यावर एक भग्न शिवमंदिर आपले अस्तित्व कसे बसे टिकवून आहे…. दुपारी एक वाजेपर्यंत आमचे दोन्ही किल्ले बघून झाले होते. त्यामुळे आम्ही रामशेज किल्ला आजच पहायचे ठरवलं.. अंकाई पासून रामशेज जवळजवळ दोन अडीच तासाच्या अंतरावर आहे.. लासलगाव ला दुपारच्या जेवणाचा आस्वाद घेतला.. जवळपास चार वाजता आम्ही रामशेजच्या पायथ्यापाशी पोहोचलो.. रामशेज म्हणजे रामाची शय्या .. श्रीराम वनवासात असताना त्यांनी या डोंगरावर काही दिवस मुक्काम केला होता. त्यामुळे या डोंगराला व किल्ल्याला रामशेज हे नाव मिळाले….गाड्या पार्क करून आम्ही लगेच रामशेज चढायला सुरुवात केली.. किल्ला डावीकडे ठेवत वाटेने जात असताना पुढे गेल्यावर काही पायऱ्या लागतात तसेच गडावर शिरताना गुहा दिसते.. या गुहेत पाण्याचा कोरडे टाक असून एक छोटीशी पिंड ठेवलेली आहे.. थोडे वर चढून गेल्यावर रामाचे मंदिर असलेली एक गुहा आहे. या गुहेच्या खालच्या बाजूला पाण्याचे टाके आहे येथील पाणी पिण्यायोग्य आहे.. दर्शन घेऊन आम्ही उध्वस्त प्रवेश द्वारातून थेट गडावर पोहोचलो.. गडावर ध्वजस्तंभ पाण्याच्या टाक्या ,टेहळणीचा बुरुज ,जाते ,वाडा ,चुन्याचा घाणा, भवानी मंदिर वास्तु दिसून येतात.. येथून समोरच देहेरचा किल्ला आणि चांभार लेणी हा परिसर दिसून येतो.. या गडावरूनच आम्ही सूर्यास्ताचा मनमोहक नजारा अनुभवला व गड उतरायला सुरुवात केली.. वेळ असल्यामुळे आम्ही किल्ले त्रिंगलवाडीच्या जवळच मुक्काम करायचे ठरवले , सायंकाळी रस्त्यावर वर असलेल्या बालदुरी गावामध्ये, मारूती मंदिरा मध्ये आमची रहायची सोय झाली, भगत यांनी आमच्या जेवणाची सोय केली.
दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे आम्ही मुक्कामाचे ठिकाण सोडून किल्ले त्रिंगलवाडीच्या पायथ्याशी पोहोचलो…. घोटी गावापासून ट्रींगलवाडी किल्ल्याला जायला रस्ता हा खराब असल्याने जाण्यास वेळ लागतो.. एक छोटा शाळकरी मुलगा आम्हा सोबत गाईड म्हणून यायला तयार झाला. सकाळी सात वाजता आम्ही किल्ल्याला जाणारी वाट धरली ..अगदी पाच दहा मिनिटातच आपण एका लेणी जवळ पोहोचतो …लेणी पाहून झाल्यानंतर गड चढायला सुरुवात केली. जवळपास पंधरा-वीस मिनिटांवर आपण एका छोट्या पठारावर पोहोचतो.. समोरच किल्ल्याची कातळ टोपी दिसते.. या कातळापासून दोन वाटा किल्ल्यावर जातात आम्ही डावी कडून जाणारी वाट धरली…. या वाटेने जाताना पायऱ्यांच्या अगोदर एक छोटासा कातळ टप्पा लागतो. तो चढून वर गेल्यावर कातळात कोरलेल्या उंच पायर्या आपल्याला या किल्ल्यावर घेऊन जातात ..पायऱ्यांच्या शेवटच्या टप्प्यात समोरच जवळपास पाच फूट उंचीची हनुमानाची भव्य व सुंदर अशी मूर्ती दिसून येते .उजव्या बाजूला कातळात कोरलेले सुंदर प्रवेशद्वार असून त्यावर दोन शरब कोरलेले आहेत.. पायवाट चालून जाताना डावीकडे असलेल्या शंकराच्या मंदिरा जवळ घेऊन जाते.. या मंदिराच्या समोर पूर्वेला कळसुबाई उत्तरेला हरिहर ,बस गड असा परिसर दिसतो.. मंदिर बघून थोडा आराम करून मागे फिरून येताना आम्ही वाड्याचे अवशेष तसेच तटबंदीचे अवशेष पाहून घेतले.. गडावर कातळात कोरलेली मोठी गुहा असून पिण्याच्या पाण्याचे टाके सुद्धा आहे.. गड उतरताना आम्ही दुसरी वाट निवडली.. जवळपास साडेनऊ वाजता आम्ही आमच्या गाड्या पार्क केलेल्या ठिकाणी पोचलो.. यापुढे वेळ भरपूर असल्यामुळे आम्ही कवणाई किल्ला करायचा ठरवला… जवळपास अकरा वाजता आम्ही कावनई गावाजवळ पोहोचलो.. गावात शिरल्यावर उजव्या हातालाच आपल्याला हा किल्ला दिसतो. गावात महादेवाचे व हनुमानाचे मंदिर आहे.. जाणाऱ्या वाटेची चौकशी करून आम्ही किल्ला चढायला सुरुवात केली.. सुरुवातीलाच आपल्याला एक समाधी दिसून येते.. इथून पुढे चालत राहिल्यानंतर सोंडेच्या शेवटी एक छोटे टेकडी लागते.. या टेकड्याच्या वरच्या बाजूस कातळ बुरूजावर फडकणारा भगवा दिसून येतो.. येथून वाट डावीकडे वळून परत उजवीकडे फिरते व गडाच्या कड्या खालून एका घलीतून थेट गडाच्या दरवाजापर्यंत घेऊन जाते…. गडा च्या खाली असलेल्या काही पायऱ्या आजही शिल्लक असून काही पायऱ्या झीजून गेल्यामुळे त्या ठिकाणी लोखंडाची शिडी लावलेली आहे.. गडावर एक विस्तीर्ण असा तलाव दिसून येतो.. तलावाच्या काठावर एक लहानसे कावनाई म्हणजेच कामाक्षी देवीचे मंदिर आहे.. यामध्ये देवीच्या सुंदर अशा मूर्ती आहेत.. जवळच एक पुजारी तेथे वास्तव्यास आहेत.. येथे आम्ही आराम करून पुढील प्रवासाचे नियोजन केले… अजून बराच वेळ शिल्लक असल्यामुळे आम्ही खाली उतरून लगेच एक किलोमीटर जवळ असलेले कपिलधारा हे प्रसिद्ध ठिकाण पाहिले.. ठिकाण सिंहस्थ कुंभमेळ्याचे मूळ ठिकाण म्हणून आजही प्रसिद्ध आहे.. जवळच आणखी एक किलोमीटर गेल्यावर श्री गजानन महाराज यांचे मंदिर आहे. येथे दर्शन घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो… अजून वेळ हातात असल्यामुळे आम्ही सिन्नर जवळील गोंदेश्वर मंदिर पहायचे ठरवले…. हे मंदिर पुरातन हेमाडपंती शैलीतील बांधकामाचा उत्तम नमुना आहे हे मंदिर बांधलेले आहे…. अतिशय सुंदर असे हे मंदिर हे पाहण्यात आमचा अर्धा तास कसा निघून गेला हे कळून आले नाही.. दुपारी चार वाजता आम्ही पुण्याच्या दिशेने निघालो.. राजगुरुनगर जवळ जेवणाचा आस्वाद घेऊन आम्ही दहाच्या सुमारास आपापल्या घरी पोहोचलो…. या पूर्ण प्रवासात वेळेचं काटेकोर नियोजन केल्यामुळे आम्हाला पाच किल्ले व तीन मंदिर पाहता आले….
राहुल खेडकर…

Leave a Reply