तारीख: ५ डिसेंबर २०२४
बाईक राईड: पुणे – वीर धरण बॅकवॉटर्स – नाईक निम्बाळकर वाडा – संतोषगड किल्ला – वर्धंगड किल्ला – श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिर – सज्जनगड किल्ला – पुणे
एकुण किलोमीटर: ३६०+ किमी
रविवार, ५ डिसेंबर २०२४ रोजी, मी पुण्याहून सुरुवात करून साताऱ्याच्या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक खुणा शोधण्यासाठी ३६०+ किमी चा अविस्मरणीय बाईक राईडसहीत छोटेखानी ट्रेक केले. या प्रवासामध्ये विविध निसर्गरम्य स्थळे, ऐतिहासिक किल्ले, आणि शांत मंदिरे समाविष्ट होती, ज्यामुळे साहस आणि शांतीचा परिपूर्ण संगम मला अनुभवता आला. माझ्या या प्रवासाचा संपुष्टात तपशील आणि स्थळांच्या समृद्ध इतिहासासह हा लेख सादर आहे.
पुणे ते वीर धरण बॅकवॉटर्सः
नेहमीप्रमाणे प्रवासाची सुरुवात घरातून म्हणजे पुण्यातून सकाळी ६:३० वाजता वीर धरण बॅकवॉटर्सकडे जाण्याने झाली. पुणे-कात्रज-सारोळा-वीर मार्गावर प्रवास करताना रस्त्यांवरील निसर्ग सौंदर्य आणि ताजेतवाने वातावरण अनुभवायला मिळाले. पुणे-सातारा महामार्ग पंढरपूर फाट्यापर्यंत वर्दळीचा होता, पण वीर धरणाच्या दिशेने वळताच शांततेने वेढलेल्या प्रशस्त रस्त्यांनी मन मोहून घेतले. समुद्रासारख्या विस्तीर्ण दिसणाऱ्या वीर धरणाच्या बॅकवॉटर्सच्या भव्यतेने मी स्तब्ध झालो. इथे निसर्गाच्या शीतलतेत ३० मिनिटे रमून नंतरच्या प्रवासासाठी ऊर्जा संचित केली.
साधारण ८ः४५ ला वीर धरण सोडले आणी पुढे सकाळी १० वाजता मी फलटण येथे महाराणी सईबाईंच्या नाईक निम्बाळकर वाड्यावर पोहोचलो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नीच्या घराचे हे ठिकाण ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे. एकेकाळी भव्य वास्तु असलेला हा वाडा आज अवशेषांच्या स्वरूपात आहे. तरीही वाड्याच्या भव्य भिंती आणि प्रवेशद्वार आजही दिमाखात उभे आहेत. आत जाऊन तुम्हाला ही भरभक्कम चौफेर भिंत दिसते. दरवाज्याच्या डाव्या बाजूस एक बारव म्हणजे विहीर असून तिचं बांधकाम पूर्ण शाबूत आहे आणी पाणी पण स्वच्छ आहे. मराठा वारशाचे वैभव दाखवणारा हा वाडा सईबाईंच्या साथीने आणि सल्ल्याने शिवाजी महाराजांच्या जीवनाला नवी दिशा देणारा होता.
पुढचा थांबा होता संतोषगड किल्ला, जिथे मी दुपारी पोहोचलो. बालसिद्धनाथ मंदिराजवळ बाइक पार्क करून मी ३०-४५ मिनिटांच्या ट्रेकने किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचलो. किल्ल्याचा महादरवाजा पार केल्यानंतर एक पायरी वर गणेश आणि हनुमानाच्या मूर्ती स्वागतासाठी होत्या. किल्ल्याच्या माथ्यावरून त्याच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष पटते.
संतोषगडाबद्दल थोडक्यात: हा किल्ला बहामनी काळात बांधला गेला आणि नंतर मराठ्यांनी तो मजबूत केला. हा किल्ला आसपासच्या भागावर देखरेख ठेवण्यासाठी महत्त्वाचा होता. किल्ल्याच्या जलताकीत असलेल्या पुलावर बांधलेले महादेव मंदिर हे इथले लपलेले रत्न आहे. मी हे नपहाताच खाली उतरणार होतो पण टाक्याच्या दुसऱ्या बाजुने हे पुलावरील मंदिर स्पष्ट दिसले आणी मागे वळवत मी ह्या मंदिराच्या दर्शनासाठी खाली उतरलो. हे मंदीर खुप भारी आहे असे कुठेच नाही!
किल्ल्याचे दर्शन घेतल्यानंतर मी खाली ताथवड्यात बालसिद्धनाथ मंदिरात दर्शन घेतले. नवनाथांपैकी एक असलेले बालसिद्धनाथ हे नाथ संप्रदायाचे महान गुरु मानले जातात. या मंदिराच्या आजूबाजूच्या राम मंदिर, पंचमुख शिव मंदिर, आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिरांची पुनर्बांधणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती.
छोट्या अल्पोउपहारानंतर मी वर्धनगड किल्ल्याकडे निघालो. ताठवडा-डिस्कळ हा घाट रस्ता अतिशय सुंदर होता. पुढे लाल्गुन मधून दुपारी २:३० वाजता मी वर्धनगडाच्या पायथ्याशी पोहोचलो. २५-३० मिनिटांच्या ट्रेकनंतर किल्ल्याच्या महादरवाजाजवळ पोहोचलो. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या या किल्ल्याचा उपयोग परिसराच्या संरक्षणासाठी आणि युद्धांदरम्यान आश्रयासाठी होत असे. किल्ल्यावर बुरुज, जलकुंडे, आणि वास्तूंचे अवशेष आजही पहायला मिळतात. त्यापैकी चोरदरवाजा, महादेवाचे मंदीर, वर्धिनीदेवीचे मंदिर शाबूत आहे. खाली उतरून पुढील प्रवासासाठी साताऱ्याकडे कुच केली!
दुपारी ४:१५ वाजता साताऱ्यातील चिदंबरम नटराज मंदिरात पोहोचलो. द्रविड स्थापत्यकलेचा नमुना असलेले हे मंदिर तमिळनाडूतील प्रसिद्ध चिदंबरम मंदिरावर आधारित आहे. येथे भगवान शिव यांचे नटराज रूपातील पूजन होते. मंदिराच्या पवित्रतेमुळे फोटोग्राफीस प्रतिबंध आहे, ज्यामुळे इथे भक्तिमय वातावरण अनुभवता येते.
ढोल्या गणपती मंदिर आणि यवतेश्वर मंदिर वगळून मी सज्जनगड किल्ल्यावरील सूर्यास्त पाहण्याचा निर्णय घेतला. साधारण अर्धा तास २१ किलोमीटर अंतरावर सायंकाळी ४:५० वाजता सज्जनगडावर पोहोचलो. दोन महादरवाजे ओलांडून मी मंदिराजवळ पोहोचलो. “सज्जन लोकांचा गड” म्हणून ओळखला जाणारा सज्जनगड संत रामदास स्वामींचे अंतिम निवासस्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे अध्यात्मिक गुरु असलेल्या रामदास स्वामींच्या स्मृतींनी हा किल्ला पवित्र आहे.
उर्मोडी धरणाच्या दृश्यस्थळावरून मी सोनेरी आणि केशरी रंगांनी भरलेला सुंदर सूर्यास्त पाहिला. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मी उतरणीला सुरुवात केली.
परतीचा प्रवास आणि समाधानाचा क्षण
संध्याकाळच्या गडद रंगांनी आसमंत भरला होता. पुण्याकडे परतीच्या प्रवासावर निघालो, आणि मन विचारांत गढून गेलं. या प्रवासाने मला काय दिलं? एक अनुभव जो इतिहासाच्या गाभ्याला स्पर्श करणारा होता, निसर्गाशी मैत्री करणारा होता, आणि मनाला शांतता देणारा होता.
हे फक्त प्रवास नव्हतं; ती एक भावनिक सफर होती. या गडकोटांनी मला शिकवलं, इतिहास फक्त पुस्तकांत नाही, तो अनुभवायचा असतो. पुढच्या बाईक राईडसाठी मनात नवी प्रेरणा घेऊन मी पुण्यात पोहोचलो, आणि समाधानाचा एक दीर्घ श्वास घेतला
अतिशय सुंदर वर्णन