मार्ग: बोरवाडी – सिद्धघड – दमदम्या डोंगर – गायदरा – भट्टीचे रान – कोंडवळ – भीमाशंकर – गणेश घाट – पदरगड – खांडस – म्हसा – बोरवाडी
तारीख: २३-२४ मार्च २०२४
दिवस पहिला: बोरवाडी → सिद्धघड → गायदरा → भट्टीचे रान → कोंडवळ → भीमाशंकर
आम्ही पाच जणांनी असा हा आगळावेगळा गिर्यारोहणाचा बेत लिलया पार पाडला. नियोजितप्रमाणे, मी (प्रविण) सकाळी ३ वाजता उठलो आणि वारजे येथे राहणारे आमचे मित्र साकेत मिठारी यांच्या घरी पोहोचलो. तसेच बाकीचे दोघे, सचिन साळुंखे आणि अजित भोसले, तिथे पोहोचले होते. आमच्या गाड्या साकेत यांच्या घरी सुरक्षित ठेवून आम्ही चौघांनी सिद्धगड पायथ्याशी असलेल्या बोरवाडी गावाकडे प्रस्थान केले. आमचा प्रवास असा होता – वारजे-लोणावळा-तळेगाव-खोपोली-कर्जत-म्हसा. एकूणच हा प्रवास अत्यंत उत्साहवर्धक होता. बोरवाडी हे जेमतेम १५-२० घरांची वस्ती असलेले छोटेसे गाव. तिथे आम्हाला फक्त म्हातारी मंडळी दिसली. जागा पाहून गाडी पार्क केली आणि ट्रेकला सुरुवात केली.
पहाटे ७:३५ च्या दरम्यान आम्ही पायथ्यापासून चढायला सुरुवात केली. हा ट्रेक तसा जास्त लोक करत नसावेत कारण मळलेली वाट पानगळीच्या पानांनी झाकली होती, पण तोही अनुभव असल्याने रस्ता चुकायचा प्रश्नच नव्हता. साधारण अंगावर असणारी चढाई करून आम्ही थोडा विसावा घेतला. पुढे थोडं वर चढून करवंदांच्या बागेमधून आम्ही माचीवर असलेल्या छोट्याशा वस्तीत पोहोचलो. जेमतेम १० घरांची वस्ती असलेल्या याच माचीला सिद्धघडपाडा म्हणतात. इथे गेलं की पाड्यावरचा चहा हा धडा आठवला नाही तर नवलच. पाड्यावर बहुतेक वयस्कर लोकच राहतात, जी आजही तरुणाईला लाजवतात असे कणखर आहेत. प्रदेशात कमाईची अत्यल्प साधने आहेत किंवा नाहीतच, म्हणून तरुणाई शहरांकडे वळलेली पाहायला मिळते. आपलं सरकार हिमाचलप्रमाणे सह्याद्रीचा विकास करू शकत नाही, ही खंत वाटतेच. कमीत कमी रस्ते तरी व्यवस्थित असावेत, पर्यटनाला वाव द्यावा.
असो विषयाकडे परत येऊ.
बाहेर एक काका बसले होते. त्यांना आम्ही खायला काही मिळतंय का, अशी विचारणा केली तेव्हा आनंदाने त्यांनी पाण्याची बाटली हातात देत पोहे मिळतील असे सांगितले. मग काय, गरमागरम पोहे आणि पाड्यावरचा चहा घेऊन आम्ही आमच्या पाठीवर असलेल्या बॅगा तिथेच काकांकडे ठेवून बालेकिल्ला सर करायला सुरुवात केली. बालेकिल्ल्याची वाट तशी बिकट आणि निसरडी आहे. चार-पाच ठिकाणी निसरडा दगडी पॅच पार करावा लागतो. मनात आले—‘उतरताना जमेल का?’ 🤔 पण गिर्यारोहणाच्या अनुभवावर भरवसा ठेवून आम्ही मार्गक्रमण सुरू ठेवले. ह्या पॅचेस पार केल्यावर वर एक छोटी गुहा लागते, ज्यात सुबक असे श्री विठ्ठल रेखाटलेले दिसले. काही क्षण तिथे थांबून दर्शन घेतले आणि पुढे निघालो.
माथ्यावर पोहोचल्यावर प्रथम नजरेस पडली ती महादेवाची पिंड, नंदी, विरगळ आणि जुन्या वाड्याचे अवशेष. माथ्यावरून दिसणारा नजारा अवर्णनीय होता. उजव्या बाजूस एक मस्त असा चिलखती बुरुज आहे आणि एक दरवाजा आहे, जो पूर्वीचा राजमार्ग असावा. ह्या दरवाज्यातून सहज गोरखगड नजरेस पडतो. थोडा वेळ माथ्यावर घालवून निसर्गसौंदर्य पाहत आम्ही पुन्हा उतरण्यास सुरुवात केली.
आणि समोर पसरलेला सह्याद्रीचा अफाट कातळ प्रदेश! नजरेच्या टप्प्यात न मावणारे डोंगररांगेचे दर्शन अक्षरशः डोळ्याचे पारणे फेडणारे. इथूनच समोर दमदम्या डोंगर आपल्याला खुणावत असतो. डाव्या बाजूला दरवाज्याचे अवशेष आणि ढाळज नजरेस पडतो, जिथून प्रवेश केल्यावर आपण एका भल्यामोठ्या झेंड्याखाली येतो. हा झेंडा आपण चढत असताना खालूनही दिसतो, पण आता अगदी जवळ असल्याने त्याची भव्यता जाणवते. बालेकिल्ल्यावर असलेल्या एका टाक्यातील शेवाळाचा हिरवा थर बाजूला सारून आम्ही थंडगार पाणी भरले. तिथून नजरेस पडणारा प्रदेश मंत्रमुग्ध करणारा होता— दमदम्या डोंगर, मंछिंद्रगड, गोरखगड, भीमाशंकर, पदरगड, सभोवतालची गावे, आणि कोतवालांचे समाधी स्थळ! एक वेगळाच आनंद मनात दाटून आला होता.
पण इकडे मात्र विषय वेगळाच वळला!
भीमाशंकर डोळ्यांसमोर नव्हे, तर थेट मनातच आलं. आज होळी पौर्णिमेचा खास योग होता आणि हा योग सहज परत मिळणारा नव्हता. त्यामुळे मी एक विचार बोलून दाखवला—”आपण भीमाशंकर आणि पदरगडही करूया का?” मग काय, सगळेच पट्टीचे फिरस्ते! एकमेकांकडे पाहिलं आणि दोन मिनिटांत निर्णय घेतला—नवीन मोहिमेची तयारी सुरू झाली!
पूर्वनियोजनानुसार आम्ही बोरवाडी-सिद्धगड-गायदरा-भट्टीचे रान-अहुपे-अहुपे घाट-खोपीवली असा आमच्या भटकंतीचा शेवट करणार होतो. पण आता दिशा बदलली होती, त्यामुळे मार्गही बदलला. बालेकिल्ल्याहून खाली उतरत आम्ही पुन्हा पाड्यावर पोहोचलो. सकाळी चहा-पोह्यांचा आस्वाद घेतलेल्या त्या जागी आता पुन्हा विश्रांती घेतली. तिथेच एक काका भात कांडत होते—कडकडीत शरीरयष्टी, रापलेला चेहरा, डोळ्यात अनुभवाची चमक. आम्ही त्यांना पुढच्या वाटेचा अंदाज विचारला. त्यांनी मंदीराच्या पुढे जाऊन दमदम्या डोंगराला लागून असलेल्या डाव्या बाजूने मार्ग घेण्यास सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आम्ही पुढे निघालो. GPS च्या मदतीने दमदम्याच्या दिशेने चालायला सुरुवात झाली. दुपारचा एक वाजून गेला होता. उन्हाचा चटका जाणवत असला, तरी घनदाट जंगलामुळे सावलीचा आधार मिळत होता. उन्ह-सावलीच्या खेळात मार्गक्रमण सुरू असताना अचानक जमिनीवर काहीतरी वेगळं दिसलं—बिबट्याची विष्टा!
बिबट्याच्या विष्टेत बळी पडलेल्या प्राण्यांचे केस दिसतात, त्यामुळे ती सहज ओळखता येते. काही अंतर पुढे गेलो आणि त्याच्या पाऊलखुणा स्पष्ट दिसू लागल्या. अधिक बारकाईने पाहिल्यावर एक वेगळीच गोष्ट लक्षात आली—छोट्या पावलांचे ठसे! म्हणजेच, या परिसरात मादी बिबट्या आपल्या पिल्लासह फिरत असावी. हा अनुभव अंगावर काटा आणणारा होता, पण ट्रेकर्सच्या जगात अशी अदृश्य साक्षी गूढतेची अनुभूती देत असते. चढ-उतारांचा सामना करत आम्ही जंगलात पुढे जात राहिलो आणि अखेर येतोबा डोंगर आणि दमदम्या यांच्यामधील नाळेत पोहोचलो.
हिच नाळ आणि त्याच्या बाजूने असलेला रस्ता आपल्याला भट्टीचे रान आणि अहुपे गावाकडे घेऊन जातो. वर पोहोचलो की एक खिंड लागते, जिथून डावीकडे अहुपे गाव दिसते आणि उजवीकडे भट्टीचे रान. आम्ही भट्टीच्या रानाच्या दिशेने वाट पकडली. उन्हं अजूनही तळपत होती, पण दाट जंगलामुळे छान गारवा जाणवत होता. काही वेळाने आम्ही थोडा विसावा घेतला आणि बरोबर आणलेल्या शिदोरीवर ताव मारला. दही, पिठलं आणि चपाती—सह्याद्रीच्या कुशीत हा साधा पण अप्रतिम जेवणाचा आस्वाद घेतानाचा आनंद काही औरच! घामाने डबडबलेले शरीर, चालण्याच्या श्रमाने थकलेले हात-पाय, आणि समोर मांडलेली ही ग्रामीण चव—क्षणभर वाटलं, याहून सुखद काही असूच शकत नाही. भट्टीच्या रानात शिरायच्या आधी आम्ही पुन्हा एकदा सभोवताल न्याहाळला. सभोवतालचं वातावरण, झाडीतून येणारा पक्ष्यांचा आवाज, आणि अज्ञात प्रदेशाच्या दिशेने चालत जाण्याचा थरार—या क्षणांची आठवण कायम मनात कोरली जाणार होती.
अल्पोपहार आटोपून आम्ही खिंड पार केली आणि लगेचच कोकण व देश यातील हवामानातील फरक प्रकर्षाने जाणवू लागला. कोकणातील दमट आणि उष्ण हवामानाने दमछाक होत होती, तर देशावर पोहोचताच हवेत गारवा जाणवू लागला, एकदम आल्हाददायक वाटू लागलं. भट्टीचं रान पार करताच वनरक्षक कार्यालय लागलं. नव्यानेच बांधलेलं हे कार्यालय तिथल्या जंगलाच्या निसर्गसंपन्नतेला साजेसं वाटलं. याच कार्यालयाच्या उजव्या हाताला असलेला डोंगर चढून पलिकडे कोंढावळला उतरता येतं, पण संध्याकाळचे ५:३० वाजले असल्याने तो रस्ता न घेण्याचं आम्ही ठरवलं. त्यामुळे त्या डोंगराला वळसा घालणाऱ्या नाभी (नानेघाट-भीमाशंकर) ट्रेकच्या मार्गावर आम्ही आलो. हा रस्ता पुढे तब्बल ५ किलोमीटर कोंढावळ गावाच्या दिशेने जातो. चालत राहिलो, पण गाव काही दिसेना! जिकडे पाहावं तिथे घनदाट जंगल आणि निळसर आभाळाच्या पार्श्वभूमीवर उंचसखल डोंगररांगा. शेवटी लांबवर एक छोटीशी झोपडी दिसली, जणू निसर्गानेच आम्हाला दिशा दाखवली! तिथे थांबून पाणी घेतलं आणि थोडा वेळ दम खात निवांत बसलो.
सकाळपासूनच्या दमछाक करणाऱ्या पायपिटीचं गणित मांडलं तर तब्बल २२.७१ किलोमीटर चालून झालं होतं! संध्याकाळचे ६:५० वाजले होते आणि कोंढावळ्याचं वातावरण पाहून राहण्याचा काहीही भरवसा वाटत नव्हता. कुठे जेवायचं? कुठे झोपायचं? काहीच ठरलेलं नव्हतं! यावेळी निर्णय घेणं महत्त्वाचं होतं. ५ किलोमीटर अंतरावर भीमाशंकर होतं आणि तिथे जेवण, राहण्याची सोय तर नक्की मिळेलच. शिवाय आज होळी पौर्णिमा, म्हणजेच भीमाशंकर महादेवाचं दर्शन घेण्याची संधीही मिळणार! सगळ्यांनी एकमताने ठरवलं – आता थांबायचं नाही, थेट भीमाशंकर गाठायचं!
कोंढावळ्यातून सोनूची वडाप बुक केली आणि काही मिनिटांतच भीमाशंकरच्या पवित्र भूमीत दाखल झालो! रात्रीच्या मुक्कामाची सोय कमलजाई माता मंदिरात होईल, याची पूर्वकल्पना आधीच होती. तरीही पुजारी बाबांकडे खात्री करून घेतली आणि लगेचच स्थानिक सरकारी स्वच्छतागृहात फ्रेश झालो. नंतर जवळच्या हॉटेलमध्ये झटपट गरमागरम जेवण उरकून ९:१० ला थेट दर्शनासाठी रांगेत जाऊन उभे राहिलो. मंदिर बंद होण्याची वेळ जवळ आल्याने गर्दी कमीच होती. त्यामुळे काही मिनिटांतच भीमाशंकर महादेवाचं पवित्र दर्शन झालं. 🙏
दर्शन झाल्यावर थेट कमलजाई मंदिरात पोहोचलो. इतक्या प्रदीर्घ भटकंतीनंतर झोपायची गरज सांगावी लागली नाही—सगळे आपोआप गाढ झोपेत पहुडले!
दिवस दुसरा: भीमाशंकर – गणेश घाट – पदरगड – खांडस – म्हसा – बोरवाडी
पहाटेचा अंधार, थंडगार वारा आणि जंगलाचा गडद निवांतपणा—या सगळ्याच्या साक्षीने सकाळी ४:३० ला जाग आली. शरीराला अजूनही मागील दिवसाच्या प्रदीर्घ चालीनं थकवा जाणवत होता, पण पुढचा प्रवास आणि साहसाची ओढ यामुळे पटापट आवरलं. थंडगार पाण्याने आंघोळ करून फ्रेश झालो. कालचं भीमाशंकर महादेवाचं दर्शन झालं होतं, त्यामुळे परत रांगेत उभं राहण्याची गरज नव्हती. ५:२५ वाजता कमलजाई मंदिराचा निरोप घेतला आणि मुख्य मंदिराकडे न वळता, १०० मीटर अंतरावर असलेल्या कुंपणातून जंगलात प्रवेश केला. अंधारातच गणेश घाटातून खाली उतरायला सुरुवात केली. वाटेत प्रचंड घनदाट झाडी, ठिकठिकाणी पडलेली पानगळ आणि निसरड्या उतारांमुळे चालणं जरा जपूनच होत होतं. एखादी चूक म्हणजे घसरगुंडी ठरू शकली असती! चांदणं मंद होत होतं आणि हळूहळू आकाशात पहाटेचा मंद सोनेरी उजेड उमटू लागला. जंगलाचा हा टप्पा संपत आला तसं समोर दूरवर पदरगडाचा प्रचंड सुळका नजर भिडवू लागला! कड्याच्या रौद्र देखण्या सौंदर्यानं थकवा कुठल्या कुठे पळून गेला.
साधारण साडेसहा ते पावनेसात वाजता आम्ही घाटाचा डोंगर उतरून खाली पोहोचलो. उतरताना दिसणारा लहानसा वाटणारा पदरगड, आता समोरून भल्या मोठ्या हत्तीसारखा भासू लागला! त्याचा रुबाबदार आणि बेलाग कडा पाहूनच अंगावर रोमांच उमटत होते.
पदरगडाकडे जाणारा रस्ता म्हणजे निसरड्या नाळेतून वर जाणारी खडतर चढण. आम्ही नाळ चढत चढत अखेर पोहोचलो त्या निमुळत्या दगडांच्या फटीपर्यंत. आणि हिच ती – “चिमणी क्लाइंब”, पदरगडाचा सर्वात अवघड, रोमांचक आणि कस लावणारा टप्पा! दिसायला सोप्पं वाटणारं हे निमुळतं छिद्र प्रत्यक्ष चढताना प्रचंड दमछाक करणाऱ्या पॅचमध्ये बदललं. एका वेळी फक्त एकाच माणसाला त्यातून वर चढता येईल, असा तो अरुंद रस्ता. हातांनी भक्कम पकड घेत, पायाची नीट जागा साधत, अक्षरशः कोल्ह्यासारखं सरकत आम्ही हा टप्पा चढू लागलो. शरीराचं संतुलन, हाताची ग्रीप आणि पायाची जागा—सगळंच काटेकोर हवं होतं, कारण एक चूक म्हणजे सरळ खोल दरीत कोसळण्याचा धोका! 😨
आता हेवेदावेध घेणाऱ्या या चिमणीतून बाहेर पडायचं होतं आणि पुढे अजून काय आव्हानं वाट पाहत होती, हे पाहायचं होतं! आमच्यासोबत सचिन साळुंखे होते, ज्यांनी यापूर्वी हा पॅच पार केला होता. त्यांनी अत्यंत संयमाने आणि काळजीपूर्वक आम्हा सर्वांना योग्य मार्गदर्शन करत सुरक्षितपणे वर चढण्यास मदत केली. चिमणी क्लाइंब पार केल्यानंतर वर पोहोचलो, तेव्हा समोर अवघ्या चार-पाच जणांना उभं राहता येईल एवढीच अरुंद जागा होती. उजव्या बाजूला उभा कातळ आणि त्याच्या टोकाशी खोल दरी दिसत होती. इथे रोपशिवाय चढणं धोकादायक ठरू शकतं, पण आमच्याकडे रोप नव्हतं. त्यामुळे इंद्रजीतने मागे थांबण्याचा निर्णय घेतला. आम्हीही काही क्षण साशंक झालो की वर जाणं कितपत शक्य होईल, पण काळजीपूर्वक प्रत्येक पाऊल टाकत, हातांनी कड पकडत अखेर वर पोहोचलो.
सर्वप्रथम समोर दिसला तो प्रचंड उंच, सरळसोट कातळ, जणू काही त्याने वर मान काढून आभाळाला टेकायचा प्रयत्न केला आहे. त्याच्या पायथ्याशी जुन्या काळातील काही वाड्यांचे भग्नावशेष होते, ज्या ठिकाणी पूर्वी गडावर वस्ती असावी असे जाणवत होते. त्याचबरोबर एक पाण्याचं टाकंही दिसलं. त्यातील पाणी स्वच्छ होतं, पण वर शेवाळाची हिरवट थर जमलेली होती. समोरच डोंगराचा कठीण भाग पार करण्यासाठी अरुंद वाट होती. एका बाजूला कड्यावरून खोल दरी दिसत होती, तर दुसऱ्या बाजूला निबिड जंगलाचा पसारा होता. आम्ही कड्याच्या बाजूने पुढे जात एकाकी, शांत अशा गुहेपर्यंत पोहोचलो. तिथे बसल्यावर समोर सिद्धगड आणि संपूर्ण कोकणपरिसर दृष्टीस पडला. सूर्य माथ्यावर येत असला तरी गडाच्या उंचीमुळे गार वारा वाहत होता. समोर दिसणाऱ्या विस्तीर्ण डोंगररांगा, लहानशा वाटणाऱ्या खेडी, तरंगणारे ढग आणि दूरवर पसरलेला अफाट निसर्ग पाहून एक विलक्षण समाधान मिळालं. थकवा, घाम आणि तणाव क्षणभर विसरायला लावणारा हा क्षण होता. इथपर्यंत पोहोचण्यासाठी घेतलेले कष्ट एका क्षणात सार्थ वाटले. हा अनुभव केवळ साहस नव्हतं, तर मनाला जिंकणारा, आठवणीत राहणारा एक अविस्मरणीय प्रवास ठरला.
थोडा वेळ गडावर बसून निसर्गसौंदर्याचा मनमुराद आस्वाद घेतल्यानंतर आम्ही पुन्हा चिमणी क्लाइंबच्या ठिकाणी परतलो. आता उतरण्याची वेळ होती, आणि आम्ही खांडसकडच्या वाटेने खाली जाण्यास सुरुवात केली. उन्हाळ्याचे कडक ऊन आणि रखरखीत हवामानामुळे संपूर्ण मार्गावरील माती सैल झाली होती. त्यावर सुकलेला पालापाचोळा साचल्यामुळे पाय घसरायची शक्यता अधिक होती. त्यामुळे ही वाट अधिक कठीण झाली होती, आणि आम्हालाही उतरताना चांगलाच कस लागला. खाली उतरल्यानंतर पायथ्याशी दाट जंगल समोर आले. इथे काही वेळ सावलीत विश्रांती घेतली. संपूर्ण दिवसाच्या थकव्यावर जरा भरपाई म्हणून काल रात्री घेतलेल्या भेळेवर, काजू-बदामांवर ताव मारला. थंडगार पाणी प्याल्यावर जरा तरतरी आली आणि आम्ही पुन्हा मार्गस्थ झालो.
या जंगलात ठिकठिकाणी कपड्याने बांधून ठेवलेल्या मार्गचिन्हा दिसत होत्या, जी स्थानिकांनी आणि भटक्यांनी वाट ओळखण्यासाठी तयार केली होती. अशा खुणांचा माग घेत आम्ही जंगलाच्या बाहेर आलो, तेव्हा समोरच एक मोठं, भव्य अशा कातळावर कोरलेलं पाण्याचं टाकं दिसलं. त्याच्या शांत पाण्यात सूर्यकिरण पडलेले पाहून एका क्षणासाठी सगळा थकवा विसरायला झालं. आता आमच्या समोर विस्तीर्ण मोकळं पठार होतं आणि त्याच्या पलीकडे खांडस गाव स्पष्टपणे दिसत होतं. जसजसं आम्ही गावाच्या दिशेने पुढे सरकत होतो, तसतसं हा प्रवास संपत आल्याची जाणीव होत होती. पण या मोहिमेने दिलेला अनुभव आणि आठवणी मात्र कायम मनात कोरल्या गेल्या होत्या.
सकाळचे १० वाजले होते आणि शेवटच्या टप्प्यात आम्ही घाट पूर्ण उतरून खाली आलो. समोरच एक टुमदार गणेश मंदिर दिसले. शांत, रम्य आणि भक्तीमय वातावरणाने भारावलेले हे ठिकाण पाहून वाटले, कदाचित ह्याच कारणास्तव या वाटेला “गणेश घाट” असे नाव मिळाले असावे. बाप्पांचे दर्शन घेतले आणि मनोमन एक संकल्प केला—पावसाळ्यात पुन्हा एकदा हाच मार्ग चढून भीमाशंकर सर करायचा! गणपतीला निरोप देऊन आम्ही शेवटच्या काही किलोमीटरसाठी पुन्हा मार्गस्थ झालो. अवघ्या काही मिनिटांतच खांडस गाव गाठले. गावात पोहोचल्यावर एका झोपडीसमोर थांबून सगळ्यांनी शेवटच्या आठवणी म्हणून “Mandate” अशी सेल्फी घेतली. त्या एका क्लिकमध्ये आमच्या दोन दिवसांच्या ट्रेकच्या साऱ्या आठवणी जपल्या गेल्या. एक वेगळाच अनुभव, एक आगळावेगळा ट्रेक आम्ही पूर्ण केला होता, याच समाधानाने सर्वांच्या चेहऱ्यावर थकवा असूनही एक वेगळीच चमक होती.
ट्रेकचा पायपीट टप्पा संपला असला तरी आमचा प्रवास अजून बाकी होता. आमची चारचाकी सिद्धगडच्या पायथ्याशी लावली होती, त्यामुळे तिथपर्यंत जायचे होते आणि मग पुण्याकडे प्रस्थान! या प्रवासाने शरीर दमले असले तरी मन मात्र नव्या जोमाने भरून गेले होते.
खांडस गावातून आम्ही एक भाड्याने गाडी घेतली आणि म्हसा या गावापर्यंत पोहोचलो. तिथून पुढे रिक्षाने बोरवाडीच्या दिशेने मार्गस्थ झालो. पण बोरवाडीच्या वनरक्षक चौकीवर पुन्हा आम्हाला अडवलं आणि पैसे मागू लागले. आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं की, आम्ही फक्त आमची गाडी घ्यायला आलो आहोत, कालच या मार्गाने आलो होतो आणि आमच्याकडे कालची पावतीसुद्धा आहे. त्यामुळे पुन्हा पैसे देण्यास आम्ही नकार दिला.
त्यांनी आश्चर्याने विचारलं, “असं कसं? परत कसे आलात?” त्यावर साकेतने हसत संपूर्ण मार्ग सांगितला—बोरवाडी गाव, सिद्धगड, गायदरा, भट्टीचे रान, कोंडवळ, भीमाशंकर, गणेश घाट, पदरगड, खांडस आणि म्हसा असा आमचा थक्क करणारा प्रवास ऐकून वनरक्षक अवाक झाले. क्षणभर काहीच न बोलता त्यांनी फाटक उघडले आणि आम्हाला पुढे जाऊ दिलं.
अखेर बोरवाडी गाव गाठलं. गावात पोहोचताच अपंग दादा आम्हाला पाहून खूप आनंदित झाले. तिथे त्यांच्या आई आणि कुटुंबाची विचारपूस केली. थोडा वेळ तिथेच विसावलो, फ्रेश झालो आणि मग गाडीत बसून पुण्याकडे परतीचा प्रवास सुरू केला.
एक संस्मरणीय, थरारक आणि अविस्मरणीय ट्रेक पूर्ण झाला होता!
सह्यसोबती:
🚶♂️ साकेत मिठारी
🚶♂️ प्रवीण पावडे
🚶♂️ सचिन साळुंखे
🚶♂️ अजित भोसले
🚶♂️ इंद्रजीत रंधवे
हे सह्याद्रीचे वेड घेऊन निघालेले ट्रेकर्स, निसर्गाच्या कुशीत एक अविस्मरणीय सफर! ⛰️🔥
धन्यवाद! 🙏