डुक्करपाडा – गोघोळ चढाई – अंधारी – खेतोबा – खेतोबा वाट उतराई – वाजंत्री उतराई – डुक्करपाडा
ठिकाण: जामरुंग, कर्जत
तारीख: २३ मार्च २०२५
सुरुवात: घाटवाटा मोहिमेचा रोमांच
नेमका मी घाटवाटा चाचणी दिली आणि त्यात निपुण झालो! त्याची पोचपावती म्हणून की काय मला आमच्या टीटीएमएम घाटवाटा – परिक्रमा – रेंज ट्रेक्स मध्ये सामील करून घेतले आणि गोघोळ चढाई – अंधारी – खेतोबा करण्याचा विषय जोर धरू लागला. मीही त्यात उडी घेतली आणि हा रोमांचक ट्रेक करण्याचा निर्णय घेतला.
पुण्याहून प्रस्थान
२३ मार्च २०२५ रोजी पहाटे पुण्यातून प्रस्थानाची तयारी झाली. प्रातः कार्यभाग आटोपून मी नेहमीप्रमाणे वेळेत वारजे येथे पोहोचलो. गाडी पहाटे ३ वाजता धायरी वरून निघाली अन नांदेड सिटी गेटवर डॉ. रामेश्वर कवटिकर यांना घेतलं आणि गाडी आमच्या ठरलेल्या स्टॉपवर—वारजे येथे—वेळेतच पोहोचली. आम्ही बसलो, आणि ट्रेकच्या रोमांचक प्रवासाला सुरुवात झाली. पुढे चांदणी चौक, वाकड, मुकाई चौक ओलांडत जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून सुसाट वेगाने कर्जत पार करत अखेर साधारण ६:४५ वाजता जामरुंग गाठलं.
आजचा ट्रेकही आम्हाला भरभरून देणार, यात शंकाच नव्हती. विशेषतः कारण आम्हाला भेटणार होते प्रख्यात वाटसरू—मनजीत माळवी! नवीन वाटा शोधणारा आणि त्या चिन्हांकित करणारा एक दिग्गज व्यक्तिमत्त्व!
कृष्ण मंदिरावरील धांदल” आणि “नाश्त्याचा गोंधळ”
मनजीत ह्यांनी रात्रीच कळवलं होतं की त्यांचा मुक्काम देवपाड्यातील कृष्ण मंदिरात आहे. गाडी पुढे सरकत असताना मंदिर नजरेस पडलं. मला वाटलं, ‘हेच ते मंदिर!’ म्हणून साकेतला आवाज दिला आणि आम्ही तिथे थांबलो. मंदिरात डोकावलो तर तिथे कुणीच नव्हतं! गोंधळ उडाला. लगेच मनजीत दादांना फोन लावला. समजलं की ते पुढे, जिथून ट्रेक सुरू होणार होता, तिथे आमची वाट पाहत होते! थेट तिकडे जायला निघणारच होतो, पण तेवढ्यात कळलं की संदीप चौगुले यांनी नाश्त्याची खास व्यवस्था केली आहे! मग काय, परतीचा एक दीड किलोमीटरचा फेरा पडला आणि आम्ही कामत पाड्यात पोहोचलो.
अरुंद रस्त्यामुळे आम्ही अलीकडेच गाडीतून उतरलो, तर साकेतने समोरून गाडी वळवून आणली. एका मातीच्या कोलारू घरात पोचलो. पण तिथे पाहतो तर नाश्ता अजून तयारच नव्हता! खरं तर मला काही खायचं नव्हतं—बलिदान मास सुरू असल्याने मी एकवेळच जेवण घेत होतो. मग काय, हातात आलेला फावला वेळ सत्कारणी लावायचा ठरवला आणि कामत पाड्यात फेरफटका मारायला बाहेर पडलो!
हा भाग मुंबईकरांसाठी फार्महाऊस डेस्टिनेशन म्हणून विशेष पसंतीस उतरला आहे. इथे सुंदर, छोटेखानी बंगले आणि रिसॉर्ट्स पाहायला मिळतात, तर पाड्यातील टुमदार घरे वैभव नांदत असल्याची साक्ष देतात.सकाळच्या प्रसन्न वातावरणात गावाच्या गजबजाटाने मन हरखून गेलं— कुणी ताराने कलरच्या डब्याचं टमरेल हलवत परसाकडे निघालं होतं, कुणी घराच्या व्हरांड्यात अंघोळ करत होतं, तर कुणी कोंबड्यांची घरटी उचलत होतं. एकीकडे कुणी घराभोवती झाडू मारत होतं, तर दुसरीकडे कुणी सडा-सारवण आणि रांगोळी काढत होतं.हे सगळं पाहताना नकळत बालपण जागं झालं!
शहरीकरणामुळे हरवलेला तो आनंद आज इथे पुन्हा अनुभवता आला. 🤍
कामत पाड्यातून समोर थेट कोथळीगड दिमाखात उभा! त्याच्या बाजूलाच डोंगराच्या माथ्यावर निसर्गनिर्मित भगदाड, म्हणजेच नेढं, ज्यामुळे ह्या डोंगराला नाखिंडाचा डोंगर म्हणतात. उजवीकडे नजर टाकली, तर पदरगड ठाम उभा, आणि डावीकडे आमचं आजचं डेस्टिनेशन – खेतोबा!
कामत पाड्यातआम्ही तासभर अडकून पडलो – फोटो, चर्चा आणि निसर्गाच्या सौंदर्यात हरवून. आणि मग आला नाश्ता!
पोहे सुदामाचे नव्हे तर हरीशचे!
पोहे मिळाले… पण कसे? घाई-गडबडीत पोहे भरपूर झाले होते, अगदी वाढीव! आणि बाकी सगळं—हळद, मीठ—कुठेतरी कमी-जास्त झालं असावं. पण हे कुणाच्या चुकण्याचा भाग नव्हता, खरं तर आमचीच घाई होती. वरून एका दमात ४-५ जणांचे पोहे वाढवायला सांगितले, आणि मग जसे झाले तसे! शेवटी हसत-हसत, एकमेकांकडे बघत पोहे संपवले आणि पुन्हा भरलेल्या पोटाने पुढच्या मोहिमेवर—डुक्करपाड्याकडे, उर्फ देवाचापाडा!🚶♂️
खरं पाहता जरा उशीर झाला.
थेट जांबरुंगमध्ये आत जाताना नदीवर एक पूल लागतो. त्या पुलाच्या अलीकडे उजवीकडे एक छोटासा डांबरी रस्ता वळतो. तिथून अवघ्या पाच-सातशे मीटरवर आहे डुक्करपाडा—एक छोटीशी, टुमदार आणि स्वच्छ वस्ती. वाडीत शिरताना नव्याने बांधलेले कृष्ण मंदिर नजरेस पडले. आम्ही सह्याद्री फेज ४ मधील खासगी फार्महाऊस प्रकल्प पार करत तिथे पोहोचलो, आणि काय? समोर काही जण आमच्या येण्याची वाट बघत रडवेल्या चेहऱ्याने उभे होते! तेच होते मनजीत आणि त्यांचे मित्र—आजचे आमचे मार्गदर्शक. आम्ही ठरलेल्या वेळेपेक्षा उशिरा पोचलो होतो, त्यामुळे त्यांना चांगलाच वेळ गेला होता—किंवा नेमकं बोलायचं तर बराच वेळ वाया घालवला होता. पण आता त्यांची क्षमा मागून काही उपयोग नव्हता. ट्रेकमध्ये उशीर झाला, की मग उन्हाच्या झळा, दमछाक, आणि संपलेलं पाणी यांची शिक्षा आपोआपच मिळते! 😅
ट्रेकची सुरुवात: डुक्करपाडा ते गोघोळ नाळ
आपण आता जिथे आहोत, तो हाच डुक्करपाडा! वेळ न दवडता आम्ही ट्रेकला सुरुवात केली. ओढ्यातून वाट काढत उजव्या हाताला सरकत आम्ही करवंदीच्या जंगलात प्रवेश केला. काही वेळातच आम्ही गोघोळ नाळेच्या तोंडाशी आलो आणि काय? समोर मोठमोठे दगड आपले सहर्ष स्वागत करत उभे होते! सुरुवातीपासूनच हि नाळ दमछाक करणारी आहे—दगडांवरून उड्या मारत, काही ठिकाणी कातळ सर करत पुढे जावे लागते. शरीर एका ठराविक तापमानाला सरावते तोवरच आम्ही घाई केली होती, त्यामुळे सुरुवातीला थोडी धाप लागली. सकाळच्या थंडगार वातावरणाचा आधार होता, पण जसजसे वर गेलो, तसतशी झाडी दाट होत गेली आणि नाळही निमुळती होत गेली. थोडे पुढे जाताच समोर उंचच उंच झाड लागले. तिथून उजवीकडे वळताच गोघोळ नाळ संपते आणि मग सुरू होते पदरातून माथ्यावर जाणारी “अंधारीची वाट”
अंधारीची वाट: उन्हाळ्यातली थंड सावली
अंधारीची वाट म्हणजे उन्हाळ्यात निसर्गाने दिलेली नैसर्गिक छत्री! उंचच उंच झाडांची गर्दी, जमिनीवर पानगळीचा मऊ गालिचा, आणि मध्येच येणारी थंड वाऱ्याची झुळूक—सूर्यकिरणांनाही भेदू न शकणारी ही दाट सावली उन्हाच्या कडाक्याला सहज आव्हान देणारी वाटते.
जसं अंधारबन त्याच्या सदाहरित जंगलाने आणि कायम गूढ सावलीने वेढलेलं असतं, तसंच अंधारीची वाटही उन्हाळ्यातही गूढ, शांत आणि थंडगार राहते. अंधारबनच्या घनदाट जंगलात जसा प्रकाश संघर्ष करत आत येतो, तसंच इथेही झाडांची जाळी सूर्यप्रकाशाला पार करू देत नाही. त्यामुळे रखरखीत उन्हाळ्यातही हा भाग शांत, आल्हाददायक आणि निसर्गाच्या कुशीत हरवलेला वाटतो.
इथे प्रत्येक पाऊल ठेवल्यावर एक नवा अनुभव येतो. मध्येच एखादा मोठा खडक वाट अडवतो, तर कधी एखाद्या सुक्या पानाच्या सळसळीत जंगली प्राण्याच्या हालचालीचा भास होतो. पक्ष्यांच्या मंजुळ किलबिलाटात अचानक वाऱ्याचा झोत अंगभर गारवा पसरवतो. उन्हाळ्याच्या तडाख्यातही ही वाट थंडगार वाटावी, म्हणूनच तिला अंधारीची वाट म्हणतात—निसर्गाच्या कुशीत हरवण्याचा सुखद, गूढ आणि अविस्मरणीय अनुभव!
अंधाराची वाट एका कातळ कडेने जाते, जिथे प्रत्येक पाऊल सावधगिरीने टाकावं लागतं. उजवीकडे खोल दरी आणि आधाराला काहीच नाही—केवळ मनाचा ठाम विश्वास आणि पायाखालची भुसभुशीत वाट. चालताना साकेतचा पाय थोडा सरकला, पण त्याच्या ट्रेकिंग कौशल्यामुळे तो लगेच सावरला. थोडंसं खरचटलं, पण त्यांच्या आत्मविश्वासाने सगळेच निर्धास्त झाले. अशा वाटांवर प्रत्येक क्षणात साहस आणि संयमाची खरी परीक्षा असते! अंधारीची हि वाट दैत्यासूर धबधब्याच्या बाजूने डावीकडून थेट माथ्यावर जाते. उन्हाळ्यात हा धबधबा कोरडा पडतो, पण पावसाळ्यात इथे असलेली गच्च झाडी आणि धबधब्याचा प्रपात बघण्यासारखा असतो!
दैत्यासूर धबधबा—
हा नाव ऐकताच वाटतं, इथे काहीतरी भन्नाट असणार! पण हाय रे दैवा, मार्चच्या रणरणत्या उन्हात तो बघायला मिळणं तसं अशक्यच. हा धबधबा पावसाळ्यात मात्र अक्षरशः जिवंत होतो. कोथळीगडाच्या मध्यावर असलेल्या पेठेची वाडी गावाच्या समांतर उंचीवर, नाखिंडा डोंगरालाही जो पदर सुटला आहे, त्याच पठारावरून अनेक धबधबे रांगेत खाली कोसळतात. (स्थानिक भाषेत “पदर” म्हणजे एका विशिष्ट उंचीवर डोंगराला समांतर असलेले विस्तीर्ण पठार). त्या सगळ्यात सर्वात भव्य आणि दिमाखदार म्हणजेच “दैत्यासूर धबधबा”! उंच कातळ भिंतीवरून एकामागून एक कोसळणारे हे धबधबे बत्ताश्यांच्या माळेसारखे दिसतात—सजावटीसाठी लावलेल्या दिव्यांच्या माळेसारखे झरझर खाली वाहतात. पण, ह्या धबधब्याच्या तळाशी जायचं असेल, तर तासाभराची बिकट चढाई करावी लागते. आणि एकदा तिथे पोहोचलात की हा अजस्त्र धबधबा त्याच्या रौद्र भीषण रूपात समोर उभा ठाकलेला असतो—अत्यंत रोमांचक पण तितकाच धोकादायक! कारण हा प्रपात प्रचंड उंचावरून कोसळतो, आणि एक चूक झाली तर थेट सरळ खाली प्रवास! 😅 आता, जर ही बिकट चढाई करायची नसली, तरी चिंता नको! फार्म हाऊसच्या प्रोजेक्टच्या मागे दोनचार कमी प्रवाहाचे धबधबे असतात. तिथे पोहोचणं तुलनेनं सोपं आणि सुरक्षित असतं. त्यामुळे, थोडंसं भिजायचं आणि पावसाळी ट्रेकचा आनंद घ्यायचा असेल, तर ही ठिकाणं एकदम परफेक्ट!
अंधारीच्या वाटेवर अनपेक्षित भेट
अंधाराच्या वाटेचा निम्मा टप्पा पार करत असताना आम्हाला काही ओळखीचे ट्रेकर भेटले. कोरड्या ओढ्याच्या कडेला, मस्त कातळावर बसून गप्पांचा फड रंगला होता. थकलेल्या शरीराला थोडी विश्रांती आणि मनाला छान टॉनिक मिळालं!
मुकुंद पाटे आमच्या सोबत येणार होते, पण “वाजंत्री घाट” ऐकताच त्यांनी प्लॅन बदलला! 😄 मग त्यांनी संतोष आणि वैशाली ताईंसोबत वेगळा रस्ता धरला – जांबरुंग – घोगोळं नाळ – अंधारीची वाट – नाखिंदा माची – नाखिंदा घाट – पेठमाची – पावट्याची नाळ असा भन्नाट ट्रेक!
पण तोवर आमची सफर एकत्र होती – अंधारीची वाट संपेपर्यंत, लोभीच्या वाटेपर्यंत! तिथे एक क्षणभर थांबलो, एका वळणावर ते उजवीकडे वळले आणि आम्ही डावीकडे… दोन वेगवेगळ्या वाटा, पण एकच ध्यास – सह्याद्रीचं निसर्गसौंदर्य आणि ट्रेकिंगचा असीम आनंद! 🌿⛰️🚶♂️
असो, परत आपल्या ट्रेककडे वळूया!
आमच्या नियोजनाप्रमाणे आम्ही घोघोळ-अंधारीची वाट पकडून माथा गाठायचा, तिथून थेट खेतोबा आणि मग खेतोबा-वाजंत्री घाटाने खाली उतरायचं असं ठरलं होतं. पण खरं सांगायचं तर, घोघोळ नाळ चढाई, मग खेतोबाची घाट माथ्यावरची चाल आणि शेवटी वाजंत्रीची उतराई—हा प्रवास म्हणजे ट्रेक कमी आणि एखाद्या फिटनेस टेस्टसारखा वाटत होता. माथ्यावर पोहोचलो, तोच समोर “लोभी चा मार्ग”—हे नाव ऐकून आधीच उत्सुकता वाढली. उजवीकडे नजर टाकली की नाखिंड्याच्या भागातल्या पवनचक्क्या, समोर गडाड्याचा डोंगर आणि सगळ्या दिशांना पसरलेली सह्याद्रीची विहंगम दृश्यं! लोणावळा-भीमाशंकर मुख्य वाटेने खेतोबाकडे निघालो. नाखिंदा घाटाची वाट उजवीकडे सोडली आणि डावीकडची पदरातली आडवी वाट पकडली. काही अंतरावर जातो तोच समोर एक मोठा खड्ड्यासारखा पाणवठा दिसला. गडाड्याची विहिर! उन्हाळ्यात अखेरपर्यंत टिकणारा हा खेतोबा ते नाखिंदा टप्प्यातील एकमेव पाण्याचा साठा.
फलाहाराचा कार्यक्रम
इथेच आम्ही थोडा वेळ विसावलो आणि आमचा फलाहाराचा कार्यक्रम सुरू झाला!
चिक्कू, संत्री, खरबूज, टरबूज, काकडी, अंगूर, केळी, सफरचंद—सगळं बाहेर निघू लागलं!
प्रत्येकाने भरपूर खायला आणलं होतं आणि तितक्याच उत्साहाने हादडलंही!
थोडा वेळ थांबलो, दम खाल्ला आणि पुढच्या प्रवासासाठी तयार झालो! दुपारचे १२:३० ते १ वाजले असावेत, आणि आम्ही कचरा पिशवीत कोंबत उठलो—म्हणजे खरं तर गडाड्याच्या विहिरीपाशी आराम करून परत चालायला तयार झालो. पोटातलं फळांचे वारे जरा खाली बसावेत म्हणून आम्ही सावकाश पुढे निघालो.
चालत जात होतो तोच समोर एक भग्न, अर्धवट बांधकाम दिसलं.
पहिलाच विचार मनात आला—“अरे, लोभी केला तर इथे मुक्काम शक्य आहे, अगदी पावसातही!”
(म्हणजे बघा, ट्रेकर्समध्ये एक खास गोष्ट असते—रस्त्यात काहीही धडकी भरवणारं पडकं बांधकाम दिसलं की त्याचा वापर नाईट हॉलिडे होमसारखा कसा करता येईल, याचा आधी विचार येतो!)
त्या बाजूने एक कच्चा रस्ता तांबडवाडीकडे निघतो. मुक्कामाच्या विचारात फारसा वेळ न घालवता आपल्या मार्गावर पुढे निघालो.
आम्ही सरळ मळलेल्या पायवाटेने मधला झाडी भरलेला ओढा सदृश्य वाट पार केली आणि पलिकडच्या पठारावर पोहोचलो. वाट फारशी कठीण नव्हती, पण झाडी आणि खडकाळ भागामुळे जरा दमछाक होत होती. समोर हिरवीगार, दाट झाडी आणि समोर सपाट मोकळी वाट दिसत होती. वातावरण निवांत होतं, म्हणून मी हरीशचा व्हिडिओ शूट करत होतो. तेवढ्यात— अचानक एका लाकडात पाय अडकला आणि मी रापकलो सरळ! 😵 क्षणात सगळं डोळ्यासमोर फिरलं, पण सुदैवाने काही खरं लागलं नाही. मात्र, गुढग्यात मुंग्या आल्यासारखं भयंकर झिणझिण्या येत होत्या. एकदम जबरदस्त झटका बसला! 😆
अवघ्या तासाभरात आम्ही रणतोंडी धबधब्याच्या वरच्या बाजूला आलो.
डावीकडे—नखिंदाच्या पठारापासून सुटलेले सरळसोट कातळकडे
समोर—पेठचा किल्ला
उजवीकडे—भीमाशंकरपर्यंतची रांग
निसर्गाच्या या अफाट सौंदर्यात उभं राहून आम्ही तो नजारा पिऊन टाकत होतो. पण ह्या सगळ्याची माहिती आम्हाला आमचे आजचे मार्गदर्शक मंजीत माळवी ह्यांच्याकडून मिळाली.
मंजीत दादाचा कट्टा मी पहिल्यांदाच ऐकला होता, आणि तो तितकाच भारदस्त आणि अनुभवसंपन्न वाटला. फार तसाच साधा आणि निर्मल माणूस! ट्रेकभर भरभरून प्रश्न विचारले गेले, पण प्रत्येकाचं उत्तर तो इतक्या शांतपणे आणि नेमकं द्यायचा की विचारणाऱ्यालाही समाधान मिळायचं.
ट्रेकिंग की सहल?
आता पुढचा टप्पा म्हणजे “ट्रेकिंग चालू आहे की सहल?” असा संभ्रम पडावा इतका रंगतदार होता!
कधी झाडीचा हात धरून वाट काढायची, कधी कारवीतून चुळबुळत वाट शोधायची, तर कधी दरीच्या काठाने पाय सावरत पेंगुळायचं! पण… खेतोबा काही केल्या लवकर दिसेना!
मनात विचार – “हे मंदिर आहे की हरवलेलं खजिन्याचं नकाशातलं ठिकाण?”
खेटत, धडपडत, शेवटी गर्द झाडीच्या उतारावर पोचलो आणि… “चला, आता इथेच विश्रांती आणि खादाडी!” अशी एकमुखी घोषणा झाली.
बस्स! एका क्षणात “ट्रेकिंग मोड ऑफ – पिकनिक मोड ऑन!”
सगळ्यांनी आपल्या डब्यांचे झाकणं उघडली आणि सारा ट्रेकिंग गियर “वनभोजन मोड” मध्ये गेला.
मी टोमॅटो चटणी काढली, कुणी ठेचा, कुणी कढीपत्त्याची चटणी, कुणी पुरणपोळी, कुणी उसळ!
“कुणी चपाती वाढा रे!”
“ए, त्या वाटीचा ठेचा इकडे दे ना!”
“किती चटण्या आणल्यात तुम्ही?”
एकंदरीत, ट्रेक कमी आणि पंगतच जास्त जमली होती.
जेवण झाल्यावर काही जण आपला पोटावर हात ठेवून झाडाला टेकले, काहीजण दगडावर रेलून मस्त ताणून दिलं, तर काही जण पाय पसरून म्हणाले –
“पाच मिनिटं डोळे मिटतो, मग निघूया!”
(तो ‘पाच मिनिटं’ प्रकार किती धोकादायक असतो, हे सगळ्यांना ठाऊक आहेच! 😂)
त्या क्षणी एक विचार मनात चमकून गेला –
“खेतोबा मिळेल की नाही माहिती नाही, पण हा क्षण मात्र लय भारी मिळाला!”
निवांत क्षण
निवांत क्षण पकडताच साकेतने मनजीत दादांना अगदी मनापासून आणि विचारपूर्वक प्रश्न केला –
“ मनजीत, तुम्ही ह्या वाटांचा शोध नेमका कसा लावता?”
हा प्रश्न मनजीत दादांसाठी नवीन नव्हता, पण प्रत्येक वेळी त्याचं उत्तर अधिक समृद्ध होत असावं. त्यांनी थोडंसं स्मित करत उत्तर दिलं –
“वाट शोधणं म्हणजे केवळ चालणं नाही, तर त्या वाटेचं निरीक्षण, अनुभव, आणि गरज लक्षात घेणं महत्त्वाचं असतं. तंत्रज्ञान, नकाशे, जुने अनुभव, आणि काही वेळा सहज लागलेली दिशा यांचं मिश्रण करूनच नवीन वाटा सापडतात.”
त्यांच्या या थोडक्यात दिलेल्या पण नेमक्या उत्तराने आम्हाला खूप काही शिकायला मिळालं. वाटा शोधण्याची कला ही केवळ भटकंती नव्हे, तर अनुभव, जिद्द आणि सह्याद्रीच्या रंध्रारंध्रात फिरून मिळालेलं ज्ञान आहे, हे त्यांच्या शब्दांतून स्पष्ट होत होतं.
आमच्या या सुसंवादाने ट्रेकला एक वेगळाच अर्थ मिळाला. निसर्गाची वाट निवडणं आणि ती इतरांसाठी खुली करणं, हेही एक मोठं योगदान आहे, याची जाणीव झाली.
गप्पा संपवून आम्ही पुढे चालायला सुरुवात केली. घनदाट झाडीतून बाहेर येताच, काही अंतरावर कड्याच्या टोकाशी खेतोबाचं मंदिर स्पष्ट दिसू लागलं.
त्याक्षणी मनोमन समाधान वाटलं – “हे मंदिर इतक्या जवळच होतं तर!”
खेतोबा मंदिर
गडाड्याच्या विहिरीपासून खेतोबा मंदिरापर्यंत पोहोचायला साधारण २ ते २.५ तास लागले, अर्थात त्यात जेवणाचा ब्रेक धरूनच! हा टप्पा खूप मोठा आहे—एक प्रकारचा पूर्ण वेढाच मारला गेला असं म्हणायला हरकत नाही.
खेतोबा मंदिर हा परिसरातील ग्रामस्थांचा श्रद्धास्थान आहे. आम्ही मंदिराजवळ पोहोचलो तोच खरपुड्या (बहुधा गावाचं नाव खरपुडच असावं) या गावातून दोन मुलं तिथे दर्शनासाठी आली होती. त्यांच्या सांगण्यानुसार, इथं नवस बोलून कोंबडा कापण्याची प्रथा आहे, आणि या ठिकाणी चुकलेल्या वाटसरूंना वाट दाखवण्याचंही एक पौराणिक कथन ऐकायला मिळालं.
शेवटची उतराई: खेतोबा-वाजंत्री घाट
मंदिराकडे तोंड करून उभे असता डावीकडे हलकेच सरकलो आणि घाटाची सुरूवात अगदी लपलेलीच होती—कातळाच्या बेचक्यातून अलगद उतरणारी वाट. साधी डोळ्यांना सहजसहजी दिसणारी नसली तरी योग्य नजरेने शोधली की पटकन समजते.
थोडं खाली उतरलो आणि… घनदाट झाडीभरलेली एक घळ दिसू लागली. ही दक्षिणोत्तर तिरक्या रेषेत हळूहळू टप्प्याटप्प्याने पदरात उतरत जाते. पायऱ्या असल्यासारखा हा मार्ग सरळ खालीच खाली! जसजसं उतरू लागलो तसतसं दमायला झालं. गुरुत्वाकर्षणाची कृपा म्हणा हवं तर, पण उतरायला आलं की पाय नुसते धावत सुटतात!
खाली पठारावर पोहोचलो आणि लगेच मुक्काम टाकला. आता दम खायचा आणि उरले-सुरलेलं खायचं! काकडी, फळं, आणि आणखी काही मागच्या उरलेल्या टपोऱ्या घासांवर ताव मारला.
आता पुढचा टप्पा—पठार सोडून वाजंत्री घाटाकडे जाण्याचा. इथून शिडीची वाट आणि वाजंत्री घाट असे दोन रस्ते उपलब्ध होते.
पण… थोडं भटकलो! (हे ट्रेकला आलं की ठरलेलंच!) योग्य दिशा शोधताना काही मिनिटं गेलीच. मंजीत दादांच्या सतर्कतेमुळे लवकरच योग्य वाट मिळाली.
आम्ही उजवीकडे जाणारी रानमळा शिडीची वाट सोडली आणि डावीकडे वाजंत्री घाटाच्या दिशेने सरकलो. उन्हाच्या तीव्रतेने माती निसरडी झाली होती, तर पानगळलेल्या झाडांनी वाट झाकली होती. काही ठिकाणी वनव्याने जळालेली राख हवेत उडत होती, तिचा उग्र वास नाकात भरून आला, आणि नकळतच आम्ही रुमाल नाकावर धरले. उतार खालच्या बाजूला घसरत होता, प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागत होते. पाय सटकू नये म्हणून जाणीवपूर्वक तोल सांभाळत अखेर आम्ही सावधपणे खाली सपाट भागात पोहोचलो.
तिथे झाडाची सावली पाहून जळलेल्या गवताच्या राखेवरच निवांत बसलो. दमलेल्या अंगाला थोडा आराम मिळाला, आणि फोटोशूटला उधाण आले—पाठमोऱ्या छायाचित्रांपासून उडत्या झेपांपर्यंत सगळेच कॅमेऱ्यात कैद झाले! काही वेळ तिथे घालवून, शेवटच्या टप्प्याकडे कूच केली. वाटेत एक मोठा ओढा पार करताच वरच्या पठारावर खासगी फार्म हाऊस प्रकल्प दिसू लागले. काही मिनिटांतच तिथे पोहोचलो. बाजूलाच एका ओढ्याचे पाणी अडवलेले होते—थंडगार पाण्यात हात-पाय धुऊन थोडं ताजंतवानं झालो आणि एकमेकांकडे पाहून हसलो—हा ट्रेक आपण मस्त पार पाडला होता!
आजचा ट्रेक भन्नाट झाला होता! सगळेच जण उत्साही होते, पण सिंहाचा वाटा मनजीत दादांचा होता, हे मान्य करावेच लागेल. आयफोन हेल्थ ऍपने दाखवले की मी तब्बल ३१,७४० स्टेप्स चाललो होतो—म्हणजे जवळपास २३ किमीची तंगडतोड आणि ९०० मीटरहून अधिक चढाई-उतराई एका दिवसात!
मनजीत दादा आणि त्यांची मित्रमंडळी यांचा मनःपूर्वक निरोप घेतला, एकमेकांना पुढच्या ट्रेकसाठी हसतच सोडले, आणि साधारण सायंकाळी ५:३० च्या सुमारास पुण्याकडे कूच केली. गाडीत बसल्या बसल्या डोळे मिटले, आणि मनात एकच विचार—हा ट्रेक आठवणीत राहील! 🚶♂️🏞️✨
सह्यसोबती:
-
अश्विन देशपांडे
-
एस. आर. नारखेडे
-
दीपक पाटील
-
डॉ. रामेश्वर कवटिकर
-
विनय जाधव
-
अमोल चौधरी
-
समीर कुडाळे
-
अक्षय शिंदे
-
विराज मोरे
-
मनजीत माळवी आणि मुंबईकर