ह्या सुट्टीच्या ३ दिवस काहीतरी जबरी प्लॅन करणार म्हणून बसलो होतो, पण काही करता आले नाही. घरातच कुजलो, म्हणून मग ठरवलं – आता बाहेर पडायलाच हवं!
देवाने ऐकलं म्हणावं आणि संध्याकाळी उशिरा हरीश ह्यांचा ग्रुपवर मेसेज आला, “सिंहगड अर्ध परिक्रमा करू आणि राजगड पायथ्याशी असलेल्या विंझर गावात उतरू.” वर “मी, साकेत आणि कवटीकर सर नक्की चाललो आहोत!” हेही स्पष्ट केलं. हे वाचून मी लगेच ‘चलो बुलावा आया है’ मोडमध्ये तैय्यारी दर्शवली आणि सज्ज झालो!
“सकाळची धांदल आणि “सिंहगड वारकरी”
नेहमीप्रमाणे सकाळी ४ वाजता उठलो, प्रातःविधी उरकून बरोबर ४:१८ ला साकेतकडे कूच केलं. अवघ्या २० मिनिटांत त्यांच्या घरी पोहोचलो. तितक्यात हरीश आणि पाटीलसुद्धा आले. मग आम्ही वारजेच्या बसस्टॉपवर सिंहगडच्या पीएमटी बसची वाट पाहू लागलो.
बस साधारण ५:३० ला आली, आणि गाव ओलांडून आलेल्या ह्या बस मध्ये नशीबाने आम्हाला जागा मिळाली. काही वेळातच म्हणजे साधारण तासाभरात आम्ही आतकरवाडी बसस्टॉपला पोहोचलो. तिथे कवटीकर सरांची वाट पाहत उभे होतो. तितक्यात आम्हाला संदीप दादा आणि वाहिनी भेटले – त्यांनी कात्रज ते सिंहगड ट्रेक केला होता आणि आता परतीच्या वाटेवर होते. आम्ही त्यांचं पाठवणं करून कवटीकर सरांची वाट पाहू लागलो.
लगेचच कवटीकर आले आणि आमच्या ट्रेकचा श्रीगणेशा झाला!
बाकी इकडे साकेत आणि हरीश यांच्या लोकप्रियतेला तोड नाही – सिंहगडचे रोजचे वारकरी असल्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक जण त्यांना अभिवादन करत होता. म्हंजी गडावर येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक जणांना ते ओळखत होते. सेलिब्रिटीच जणू! कुणी “ए रे, हरीशभाऊ!”, कुणी “ओ साकेतदादा!” म्हणत त्यांच्या दिशेने हात करत होतं.आम्ही ट्रेकला आलोय की भेटीगाठी समारंभाला, असा थोडा संभ्रम मला पडला!
“निसर्ग, रस्ता आणि भानगडी“
मेट्यापर्यंत पोहोचलो. तिथे टिळकांनी स्थापन केलेलं घोटेखानी हनुमान मंदिर आणि मागे एक टाके आहे. तिथून उजवीकडे वळताच गर्दी नाहीशी झाली आणि एक मस्त मळलेली वाट लागली.
डाव्या बाजूला ताठ सिंहगड उभा – जणू हाताला धरून चालत होता. तानाजी कडा, झुंजार बुरुज, कल्याण दरवाजा सगळं खुणावत होतं. उजवीकडे खोलपर्यंत पानगळी झाडे आणि करावी पसरली होती आणि खाली घेऱ्यातील गाव निचपीत ऊन झेलत होती. इतक्या शांत सिंहगडला पाहून मला अक्षरशः आत्मिक शांती मिळाली.
थोडं पुढे गेलो तर वाट काहीशी गोंधळात टाकणारी निघाली. अरे, कुठे जायचं? उजवीकडे? डावीकडे? की सरळ घसरणाऱ्या रस्त्याने खाली? पण जाणकार साकेत आणि हरीश होतेच – त्यांनी योग्य वाट पकडून आम्हाला एका छोट्या पदरावर आणलं. तिथे देवाचं ठाणं होतं आणि काही घरांचा कोळीवाडा नजरेस पडला.
अजून थोडं पुढे गेल्यावर थोपवाडीचा धबधबा आणि अमृतेश्वर मंदिर पाहिलं. तिथे आठ-दहा वीरगळी आणि दगडात कोरलेली शिवपिंडं होती. फोटो काढायचा मोह आवरला नाही – इतका सुंदर परिसर पाहून भूरळ पडली! मोह हो, बाकी काय?
“रस्ता करावी अदृश्य झाला बघा!”
आता आम्ही मुख्य वाट सोडून खालून पोटरस्ता धरला. काही अंतर चालल्यानंतर उजवीकडे खाली झुंजार वाडा आणि डावीकडे वर सिंहगड-राजगड-तोरणा मार्ग आहे जिकडे आम्ही गेलोच नाही.
पण इकडे ह्या रस्त्यावर वेगळंच झालं. आमचा पायाखालचा रस्ता अचानक गुप्तचरांसारखा गायब झाला! मग काय, सुरू झाला तर्क-वितर्क – “चला, उजडेल तिथे उजडेल!” पण करावी इतकी अडगळीची होती की पुढे जाणं जवळपास अशक्य झालं!
कावटीकर डॉक्टर मात्र एका वानराप्रमाणे वाकणं आणि कुठल्याशा झाडात शिरणं सुरू केलं. पण करावीने मात्र सगळ्यांना ठणठणीत आठवण करून दिली की हे काही सोपं नाही! आम्हाला काही सुचत नव्हतं, एका मोकळ्या जागेत येऊन सर्व विचारांना विराम देत आम्ही एका छोट्याशा नाळेतून वर जायचा संगनमताने निर्णय घेतला आणि मार्ग सापडला! १५-२० मिनिटांत आम्ही पुन्हा मुख्य मार्गावर आलो.
“आइसक्रीम पार्टीची पात्रता सिद्ध!”
इथं आम्ही अंगात घुसलेला करावीच कुसळ झटकून एक मोठा टप्पा ओलांडला आणि जवळची शिदोरी सोडली, भूक तर लागली होतीच. अन् इथून निघताना साकेतची स्टिक तिथंच विसरली गेली. म्हणून त्यांना लगेच शिक्षा ठोठावली – “आइसक्रीम पार्टी दे!!”
हरीश बोलले “हे बघा, नियम पक्के – हरवलेली स्टिक म्हणजे आइसक्रीम पार्टी!” साकेतला कळलं की आता सुटका नाही!
थोडं पुढे गेल्यावर राजगड आणि तोरणा अगदी स्पष्ट दिसू लागले. मोठी चढाई झाली, आणि विंझर गावही नजरेस पडलं. ११:०० वाजले होते आणि ह्या वाटेवर उन्हाचा चांगलाच फुफाटा जाणवू लागला होता. “आता गाव आलंच आहे” ह्या आशेने चालायला जोर धरला. तसाच मार्ग सोप्पा करत खाली उतरलो, गाव जवळ येताच सुरुवातीच्या एका घरात पाणी घेतलं – थेट माठातलं पाणी होतं, पोट भरलं पण मन मात्र अजून तहानलेलं होतं.
इथून मार्गक्रमण करतो इतक्यात पुढे कुल्फीवाले काका दिसले, जणू आम्हाला तारायला थेट देवानेच पाठवलं होतं! साकेतने चुपचाप आपली पात्रता सिद्ध केली आणि आम्ही सगळ्यांनी कुल्फीवर ताव मारला. आम्ही सगळे विजयी मुद्रेत कुल्फी चापत निघालो.
“विंझरचा उरूस आणि परतीचा प्रवास”
आज विंझरचा उरूस होता, त्यामुळे गावात जत्रेचा माहोल दिसत होता. गावात रेलचेल आणि लगबग सुरू होती. आमच्या कपड्यांवर करावी आणि धुळीच्या पुटात आम्ही मात्र वेगळेच जत्रेतील खेळाचे पात्र वाटत होतो. आम्ही थोडा वेळ फिरलो आणि मग वडाप पकडून नसरापूरच्या दिशेने निघालो.
गप्पा, धमाल आणि आठवणी घेऊन आम्ही घरी परतत होतो, पण मन मात्र अजूनही त्या गडरान्याच्या हिरवाईत हरवलं होतं!
आजचे सहकारी: साकेत मिठारी, हरीश कुलकर्णी, डॉ. कवटीकर, चंद्रकांत पाटील
“पुन्हा भेटू… दुसऱ्या एखाद्या ट्रेकवर!” 😉⛰️